The white powdery growth of the fungus on the vines.
वातावरणात होणारे हे बदल द्राक्ष बागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल आहेत. त्यामुळे द्राक्ष मण्यांच्या अवस्थेनुसार भुरीच्या व्यवस्थापनासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यावर्षी वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे द्राक्ष बागायतदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात सतत बदल होत आहे. दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान ७ ते ८ अंशापर्यंत कमी होत आहे. यासोबतच काही भागांत पाऊस, गारपीट तर काही ठिकाणी कमी तापमानासह अधिक प्रमाणात धुके पडत असल्याचे दिसत आहे. वातावरणात होणारे हे बदल द्राक्ष बागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल आहेत. त्यामुळे द्राक्ष मण्यांच्या अवस्थेनुसार भुरीच्या व्यवस्थापनासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. भुरीसाठी अनुकूल वातावरण
ढगाळ हवामान, कमी ते मध्यम प्रकाश, २२ ते २८ अंश सेल्सिअस अनुकूल तापमान व दमट वातावरण या बाबी भुरी रोगासाठी अनुकूल आहेत. कमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामध्ये वाऱ्यामार्फत भुरी रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होतो. वेलीवरील पाण्यामुळे कॅनॉपीमधील तापमान कमी होऊन आर्द्रता वाढते. अशा प्रकारे ‘स्पोरूलेशन’ (बीजाणूंची निर्मिती) वाढून संसर्ग झपाट्याने वाढण्यास मदत होते.सद्यःस्थितीत बऱ्याचशा द्राक्षबागा मणी सेटींगच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. ज्या द्राक्षबागांमध्ये ८ ते १० मिमी पेक्षा जास्त मण्यांचा विकास झाला आहे. अशा बागांमध्ये भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याचा शक्यता अधिक आहे. या अवस्थेमध्ये मण्यांवर बुरशीची पांढरट भुकटीसारखी वाढ होऊन मणी तडकतात. अशावेळी रोग नियंत्रणासाठी, स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करावा. सल्फर हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. मात्र, या अवस्थेत सल्फर (८५ डब्ल्यूडीजी) या फॉर्म्यूलेशनची फवारणी केल्यास मण्यांवर पांढरट डाग दिसून येतात. त्याऐवजी सल्फर (४० एस.सी) या फॉर्म्यूलेशनचा ३ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. मण्यांमध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेमधील बागांमध्येदेखील भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो. भुरीची पांढरट भुकटी घड काढणीपर्यंत काळपट होऊन द्राक्षाची प्रत बिघडते. परंतु, मणी सेटींगनंतर रासायनिक बुरशीनाशकांचा वापर केल्यास द्राक्षामध्ये रेसिड्यूची समस्या निर्माण होऊन निर्यातक्षम मालाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे रोग नियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर करणे आवश्यक ठरते. अँपिलोमायसिस क्विसक्वालिस या जैविक नियंत्रकाचा भुरीच्या नियंत्रणासाठी ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे वापर करावा. या बरोबरच पोटॅशिअम बायकार्बोनेट (५ ग्रॅम/लि), कायटोसॅन, एचटूओटू (H2O2) चे सिल्वर कॉम्प्लेक्स, क्लोरिन डायऑक्साईड, ओझोनयुक्त पाणी हे भुरी नियंत्रणासाठी वापरण्यास योग्य आहेत. मण्यांच्या वाढीच्या अवस्थेत, अवकाळी पाऊस झाल्यास मणी तडकण्याचा धोका असतो. अशावेळी चिटोसॅन ची फवारणी केल्यास भुरी नियंत्रणासोबतच मणी तडकण्यापासून संरक्षण मिळते. जैविक नियंत्रकांचा (बॅसिलस सबटिलिस, ट्रायकोडर्मा स्पेसीज आणि अँपिलोमायसिस क्विसक्वालिस) वापर बुरशीनाशकांच्या फवारण्या कमी करण्यास उपयुक्त ठरतो. दर १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोडर्मा २ ते ५ मिलि प्रतिलिटर पाणी आणि बॅसिलस सबटिलिस (डी आर-३९) २ मिलि प्रति लिटर याप्रमाणे फवारणी व ड्रेंचिंग करावे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने तयार केलेले मांजरी वाईनगार्ड द्रावण स्वरूपात व ट्रायकोशक्ती पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. फवारणीसाठी मांजरी वाईनगार्ड २ ते ५ मिलि प्रतिलिटर पाणी आणि ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर ठिबक किंवा ड्रेंचिंगद्वारे द्यावे. - डॉ. सुजोय साहा, ७०६६२४०९४६ - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)