नाव: सतीश पोपट कुळधर गाव: सायगाव, ता.येवला, जि. नाशिक पक्ष्यांची संख्या ः १२ हजार शेडचा आकार ः ५०० बाय ३० फूट
गेल्या ६ वर्षांपासून करार पद्धतीने कुक्कुटपालन करतो. ज्यामध्ये पक्षी आणल्यापासून ते पक्षी बॅच जाण्यापर्यंत प्रामुख्याने पाणी, खाद्य व हंगाम निहाय नियोजन महत्त्वाचे असते. त्यामध्ये ४५ दिवसांच्या बॅचमध्ये प्रामुख्याने नियोजन केले जाते. यामुळे पक्ष्यांची मरतूक किमान पातळीवर ठेवून विक्रीसाठी आवश्यक अपेक्षित वजन मिळते. खाद्य व्यवस्थापन
व्यवसाय करार पद्धतीने करतो. पक्ष्यांसाठी खाद्य कंपनीकडून येते. ते आल्यानंतर खाद्याच्या गोण्या स्वच्छ व कोरड्या ठिकाणी ठेवल्या जातात. जमिनीवर ठेवल्यास खाद्य खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात त्यात विशेष काळजी घेऊन पक्षी गृहाच्या मध्यभागी खाद्य ठेवतो. ब्रॉयलर पक्ष्यांच्या वाढीसाठी संतुलित आहार हा महत्त्वाचा घटक आहे. आहाराचे एक वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार योग्य मात्रेत व शास्त्रीय पद्धतीने आहार दिला जातो. दिवसातून दोन वेळेस खाद्यपुरवठा केला जातो. हिवाळ्यात पक्ष्यांची अन्नग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. सध्या खाद्य पात्रात सकाळी लवकर खाद्य भरले जाते.पक्ष्यांच्या वाढीच्या अवस्थेत ४५ दिवसांपर्यंत योग्य खाद्य व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो. त्यात बाजारात उपलब्ध गुणवत्तापूर्ण संतुलित कुक्कुट खाद्य पक्ष्यांना नियमित दिले जाते. पक्ष्यांच्या वाढीवर लक्ष ठेवून, त्याच्या नोंदी दैनंदिन वहीत ठेवल्या जातात. त्यामुळे पक्षी वजन अपेक्षेनुसार मिळते.हवामान बदलत असताना पक्ष्यांची पाण्याची गरजही बदलत जाते. बदलत्या ऋतूंमध्ये वातावरणानुसार पाणी देणे महत्त्वाचे ठरते. माझ्याकडे विहिरीचे पाणी असून, त्यातील पाण्याची गुणवत्ता प्रत्येक हंगामात वेगवेगळी असते. विशेषतः पावसाळ्यात पाणी बदलते.विहिरीतील पाणी साठवणूक टाकीत गरजेनुसार आणून ठेवले जाते. पुढे हे पाणी पक्षीगृहातील पाणी वितरण टाकीत सोडले जाते.पाणी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडर किंवा तुरटीचा वापर करतो. त्यानंतर पक्षी गृहासाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी घेतल्यानंतर त्यात ‘वॉटर सॅनिटायजर’ टाकले जाते. त्यानंतरच पाणी पक्ष्यांना दिले जाते.पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत दर्जा व गुणवत्तेचे निकष पाळले जातात. पाण्याच्या टाक्या उन्हात न ठेवता सावलीत ठेवल्या जातात. पाण्याचा सामू, गढूळपणा यानुसार पाणी स्वच्छ व निर्जंतुक केले जाते. त्यासाठी निर्जंतुक उत्पादनाचा शिफारशीनुसार वापर करतो. आता थंडी असली तरी दुपारच्या वेळी कडक ऊन पडत आहे. दुपारी पाइपमध्ये साचलेले गरम पाणी आधी काढून टाकले जाते.पाण्याचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी टाकीला व पाणी वाहणाऱ्या नलिकांनाही बारदान लावले जाते. पाणी सावलीत ठेवले जाते. यातून पक्ष्यांना पिण्यासाठी थंड पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातात. बदलत्या हवामानात नियोजन हवामान बदलत असताना हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूत तापमान नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापन केले जाते. शेडच्या बाजूला असलेले पडदे खालीवर केले जातात. उन्हाळ्यात पक्ष्यांना गरम झळा लागू नये, यासाठी पडदे खाली सोडून हवा खेळती ठेवली जाते. यासह तापमान नियंत्रित करण्यासाठी बाजूला बारदान पडदे सोडले जातात. त्यावर ठिबक पद्धतीने पाणी सोडले जाते. तसेच पक्षीगृहालगत झाडे लावली आहेत. त्यामुळे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. तापमान वाढ झाल्यास, पक्षीगृहात सूक्ष्म फवारे मारून गारवा तयार केला जातो. हिवाळ्यात थंड वारा लागू नये, यासाठी पक्ष्यांच्या वाढीच्या अवस्थेत दोन फूट वर पडदे ठेवले जातात. - सतीश पोपट कुळधर, ९८२२९५७७११