पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका टाळण्यासाठी गोठ्याचे नियोजन, चाऱ्याचे नियोजन, प्रजनन व्यवस्थापन तसेच जनावरांमध्ये लसीकरण करणे अत्यावश्यक आहे.
सध्याच्या बदलत्या हवामानानुसार जनावरांचा आहार आणि गोठ्यात बदल करावेत. यामुळे जनावरे आजारी पडत नाहीत. पावसाळ्यात सतत साचणाऱ्या पाण्यामुळे वातावरण दमट बनते. हवेतील ओलसरपणा वाढतो. यामुळे जिवाणू व विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची व पसरण्याची शक्यता जास्त असते. या काळामध्ये जनावरांमध्ये घटसर्प, लाळ्या खुरकूत, फऱ्या हे आजार होतात. संसर्ग झालेल्या जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते. हे टाळण्यासाठी जनावरांची काळजी घ्यावी. गाभण जनावरे व वासरांकडे लक्ष द्यावे.
गोठा स्वच्छ असावा. खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी रचना असावी.गोठ्यामध्ये उतार काढलेला असावा, जेणेकरून गोमूत्र, पाण्याचा निचरा होईल.पावसाळ्याआधी गोठ्यातील खाच-खळगे बुजवून घ्यावेत.गोठा जास्तीत जास्त कोरडा ठेवावा. गोठ्यात सतत ओलसरपणा राहिल्यामुळे खुराचे आजार होतात.गोठ्यामध्ये जमिनीपासून चार-पाच फुटांपर्यंत चुना लावावा. त्यामुळे गोठा जंतूविरहित राहण्यास मदत होते.गोठ्यामध्ये जंतुनाशक द्रावणाची फवारणी करावी. लहान वासरे, करडे यांना कोरड्या आणि उबदार जागेवर बांधावे. बसण्यासाठी वाळलेले गवत, पाचट किंवा पोत्यांचा वापर करावा.एखादे जनावर आजारी असल्यावर ते निरोगी जनावरे, लहान वासरांपासून लांब आणि वेगळे बांधावे. अशा जनावरांवर वेळेत उपचार करून घ्यावेत. गाभण जनावर असल्यास गोठ्यामध्ये बसण्यासाठी गवताचा गादी प्रमाणे वापर करावा.दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये.गोठ्यात ओलसरपणा जास्त प्रमाणात राहिल्यास यामध्ये जंतूची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे कासेला जंतूसंसर्ग होऊन काससुजी होते. म्हणून गोठा कोरडा राहील याची काळजी घ्यावी. दूध काढून झाल्यानंतर सड जंतुनाशक द्रावणात बुडवावेत. त्यामुळे सडात होणारा जंतूसंसर्ग टाळता येईल. पावसाळ्यामध्ये जनावरांना नुसता हिरवा चारा न देता आहारात कोरड्या चाऱ्यासह खनिजमिश्रणाचा समावेश करावा. फक्त कोवळा हिरवा चारा खाल्यामुळे जनावरांमध्ये पोटफुगी सारख्या समस्या उद्भवतात. लसीकरणापूर्वी एक आठवडा आधी जंतनिर्मुलन करावे. त्यानंतर लसीकरण करावे.पशुखाद्य कोरड्या जागी ठेवावे. त्याची वारंवार तपासणी करावी जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही. पावसाळ्यामध्ये होणारे आजार
फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत यांसारखे आजार होऊ शकतात. नवीन हिरव्या चाऱ्यामुळे पोटफुगी, जंतांचा प्रादुर्भाव होतो. गढूळ पाण्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. गोचीड, माश्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता वाढते.पावसाळ्याच्या सुरुवातीला आजारांवर प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी. वेळोवेळी पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.पावसाळ्यात जनावरांना चरायला सोडायचे असल्यास आलटून पालटून विविध ठिकाणी चारावीत.शेतातील उभे गवत, चारा ओलसर असेल किंवा त्यावर पाण्याचे थेंब असतील तर जनावर असा चारा आवडीने खात नाहीत. पाऊस पडल्यानंतर, चाऱ्यावरील पाणी हटल्यानंतर जनावरे चरायला सोडावीत.पावसाळ्यात लहान वासरे, करडांना बाहेर पावसात जास्त वेळ भिजू देऊ नये. पावसात भिजल्यामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.पावसाळ्यात पशुखाद्याचा जास्त दिवस साठा करू नये. पशुखाद्य कोरड्या जागी ठेवण्याची सोय करावी. जेणेकरून सदर पशुखाद्यास बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही. बुरशीयुक्त पशुखाद्य जनावरास खाण्यास देऊ नये. गोठ्यातील जमिनीवर ओलसरपणा आणि शेण/ लेंड्यांचा थर असल्यास कॉक्सिडियाचा प्रादुर्भाव लहान वासरांना, करडांना होण्याची शक्यता असते. म्हणून गोठ्यातील जमीन खरडून शेण, लेंड्या पूर्णतः काढाव्यात. जमीन कोरडी ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.गोठ्याभोवती पाणी साठणार नाही, दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण यातूनच माशा, डास, कीटक यांचा प्रादुर्भाव वाढतो. जनावरांचे आरोग्य बिघडून दूध उत्पादन कमी होते. गोठ्यात दलदल झाल्यास गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढतो. त्यांच्यामार्फत यकृतकृमीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. चाऱ्याच्या गव्हाणी दररोज स्वच्छ करून घ्याव्यात. कारण शिल्लक चाऱ्यावर नियमित चारा टाकत गेल्यास गव्हाणीत बुरशीची वाढ होते. चाऱ्याचा कुबट वास येतो. त्यामुळे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. - डॉ. श्रद्धा राऊत, ९२७०७०६००३ - डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४ (पशुपोषण आहारशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महविद्यालय, उदगीर, जि. लातूर)