रताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येईल. लागवडीकरिता जमीन १५ ते २५ सें.मी. खोलीपर्यंत नांगरून किंवा खोदून घ्यावी. ६० सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत.लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करावी.लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बेणे निवडावे. बेण्याची लांबी २० ते ३० सें.मी. असावी, त्यावर तीन ते चार डोळे असावेत. एका गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे ८०० तुकडे लागतात. लागवड करताना बेणे वरंब्यावर २५ सें.मी. अंतरावर लावावे. प्रत्येक ठिकाणी एक फाटा (बेणे) लावावे. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा व दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागावरील दोन डोळे मातीत पुरले जातील, अशी काळजी घ्यावी.सऱ्या करण्यापूर्वी पुरेसे शेणखत मिसळावे, तसेच लागवडीच्या वेळी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ७५ किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीनंतर ४० दिवसांनी ४० किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.लागवड केल्यानंतर १५ दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून ३० दिवसांनी करावी. त्याच वेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळे फुटतात. अशा वेळी लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत.लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी. संपर्क ः०२३५८- २८०५५८ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली