पुनरुज्जीवनासाठी फळझाडांची छाटणी केल्यानंतर झाडाभोवती काळ्या प्लॅस्टिकचे आच्छादन करावे.
फळबागांचे पुनरुज्जीवन करताना, तसेच त्यानंतरही बागांची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे छाटणीनंतर योग्य पद्धतीने झाडांचा विकास होण्यास मदत होते.
पुनरुज्जीवन करताना डिसेंबर- जानेवारी किंवा एप्रिल-मे महिन्यात झाड निवडावे. त्यानंतर पुढीलप्रकारे नियोजन करावे.
पुनरुज्जीवन करताना घ्यावयाची काळजी
निवडलेल्या झाडाला जमिनीवरून २.५ ते ३ मीटर उंचीवर काप देण्यासाठीचा भाग पांढऱ्या खडूने चिन्हांकित करावा.चिन्हांकित केल्यावर पृष्ठभागावर करवतीच्या सहाय्याने काप द्यावा. काप देताना झाडांच्या खोडावर व सालीला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी.काप दिलेल्या पृष्टभागावर बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. पुनरुज्जीवन केल्यानंतर करावयाचे व्यवस्थापन
पुनरुज्जीवन केलेल्या झाडांची व्यवस्थित सर्व बाजूंनी वाढ होणे आवश्यक असते. त्यासाठी नवीन आलेल्या फुटव्यांची तात्पुरती छाटणी करावी. बागेत नांगरणी करून झाडाभोवती सिंचनासाठी आळे तयार करावे.प्रतिझाड चांगले कुजलेले शेणखत ३० ते ४० किलो याप्रमाणात द्यावे. नवीन पालवीची उगवण होण्यासाठी गरजे इतक्या पाणीपुरवठ्याची उपलब्धता करावी.फळ झाडांच्या आजूबाजूने १०० मायक्रॉन जाडीच्या काळ्या प्लॅस्टिकच्या कागदाचे आच्छादन करावे.जुन - जुलै महिन्यात नवीन आलेल्या फुटव्यांपैकी मोजकेच फुटवे वाढू द्यावेत. बाकीच्या फुटव्यांची तात्पुरती छाटणी करावी. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात उगवलेल्या जोमदार फुटव्यांची काळजी घेऊन बाकीच्या अनुत्पादक फुटव्यांची छाटणी करावी.छाटणी केलेल्या नवीन उत्पादनक्षम फुटव्यांची दोन वर्षांपर्यंत काळजी घ्यावी. योग्यप्रमाणात अन्नद्रव्य व पाणीव्यवस्थापन करावे. तसेच कीड- रोगांपासून संरक्षण करावे. फुटव्यांना दोन वर्षे कालावधीनंतर फळधारणेस सुरवात होते. संपर्क : शशांक भराड, ९६५७७२५७११ (उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)