The soil must have good moisture during the main growth stages of the linseed crop.
मागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, तूर, मका आणि भात या पिकासाठी अनुकूल हवामान याची माहिती दिली तर आता जवस, वाटाणा आणि उन्हाळी भुईमूग ह्या पिकांचे माहिती व अनुकूल हवामान यांची माहिती पाहू. जवस जवळ हे थंड हंगामातील पीक असून मुख्यतः रब्बी हंगामात घेतले जाते. जवस पिकाच्या वाढीसाठी उष्ण आणि थंड हवामान अनुकूल आहे. पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी तापमान पुढीलप्रमाणे.
१० अंश सेल्सिअस ते ३८ अंश सेल्सिअस तापमानात पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. उगवण ते वाढीची अवस्था या कालावधीमध्ये २५ ते ३० अंश सेल्सिअस तर दाणे भरणे या कालावधीत १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान असल्यास उत्पादन चांगले मिळते. दाणे भरण्याच्या काळात जमिनीत योग्य ओलावा नसल्यास उत्पादनात व पिकाच्या प्रतीमध्ये घट होते. फांद्या लागणे, फुलोरा आणि दाणे भरणे या मुख्य अवस्थांमध्ये जमिनीत चांगला ओलावा असणे आवश्यक आहे. पिकाच्या मुख्य अवस्थांच्या वेळी योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास जवळपास दुप्पट उत्पादन मिळू शकते. उन्हाळी भुईमूग भुईमूग पीक हे एक मुख्य तेलवर्गीय पीक असून याची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. भुईमूग पीक पावसाळा व उन्हाळा या दोन्ही हंगामात घेतले जाते. पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या भुईमुगाच्या उत्पादकतेपेक्षा उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जास्त मिळते. उन्हाळी भुईमूग पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक तापमान पुढीलप्रमाणे.
उगवणीच्या कालावधीमध्ये सरासरी कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर सरासरी किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअस, फुले लागणे या कालावधीमध्ये सरासरी कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस, तर शेंगा लागणे ते शेंगा परिपक्व या कालावधीत सरासरी कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते २२ अंश असल्यास चांगले उत्पादन मिळते. फुलोरा, शेंगा धरणे ते शेंगा भरणे हा कालावधी महत्त्वाचा असून या कालावधीत जमिनीत चांगला ओलावा असल्यास चांगले उत्पादन मिळते. जमिनीतील ओलावा आणि पिकाची पाण्याची आवश्यकता बघून सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे सिंचन व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळते. वाटाणा वाटाणा पिकाची लागवड राज्यात बहुतांशी भागात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाणा थंड हवामानात वाढणारे पीक आहे. कडाक्याची थंडी व धुके यामुळे पिकावर दुष्परिणाम होतो. पीक फुलोऱ्यात असताना उष्ण हवामान असल्यास शेंगात दाणे भरत नसल्याने प्रत कमी होते.
२२ अंश सेल्सिअस तापमान पिकाच्या उगवणीसाठी अनुकूल आहे. महिन्याचे सरासरी तापमान १० ते २० अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. पीक लागवडीनंतर जमिनीत योग्य ओलावा नसल्यास हलके पाणी द्यावे. फुलधारणा ते शेंगात दाणे भरणे ही मुख्य अवस्था असून या काळात जमिनीत योग्य नसल्यास पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते.हंगाम आणि विभागानुसार शिफारस केलेल्या जातीची लागवडीसाठी निवड करावी. हवामान बदलानुसार पीक पद्धतीचा वापर करावा.पीक फुलोऱ्यावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा आवश्यक असतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुलगळ, फळधारणा न होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी या काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे. जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकांची अवस्था व तेथील हवामान या मुद्द्याचा सखोल विचार करून शक्य असल्यास सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी व्यवस्थापन करावे. पिकाच्या मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये तापमानात वाढ झाल्यास बाष्पीभवनाचा दर वाढतो. तो कमी करण्यासाठी आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी योग्य बाष्परोधकाची फवारणी करावी. त्याच प्रमाणे जमिनीवर आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होऊन उत्पादन चांगले येते. संपर्क - डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)