सिताफळ पिकाची छाटणी करताना अनुत्पादक, वाळलेल्या व दाटीवाटी करणाऱ्या फांद्या छाटून टाकाव्यात.
यंदा उन्हाळ्यातही सीताफळ फळपिकाला पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा सीताफळाचा उन्हाळी बहर घेण्याकडे कल वाढत आहे. उन्हाळी बहर घेताना अधिक तापमान व उष्ण वारे यांचा सामना करावा लागतो. त्या दृष्टीने बागेचे व्यवस्थापन करावे.
उन्हाळी बहर धरणाऱ्या काही शेतकऱ्यांनी छाटणी पूर्ण केली आहे; तर काही शेतकरी छाटणी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी बागेच्या योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.
उन्हाळी बहर धरताना घ्यावयाची काळजी :
हा बहर धरताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, सीताफळाची फळधारणा ही बागेतील आर्द्रतेवर अवलंबून असते. उन्हाळी बहरामध्ये आर्द्रता कमी झाल्याने त्याचा सीताफळाच्या फळधारणेवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा चांगली फुले लागतात, पण फळधारणा होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बागेत वाढलेले तापमान आणि कमी आर्द्रता.उन्हाळी बहर धरण्यापूर्वी बागेस ताण देणे आवश्यक असते. त्यासाठी साधारणपणे २ ते २.५ महिने पाणी तोडून पानगळ करून घ्यावी. चांगला ताण बसण्यासाठी झाडांची ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पानगळ होणे आवश्यक असते.ताण देण्याचा काळ संपल्यावर बहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. त्यासाठी बागेत पडलेली काळी पाने, रोगट फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून नष्ट करावीत.बहर धरताना पानगळ झालेल्या बागेस पाणी द्यावे. त्यानंतर ७ ते १० दिवसांनी बहराची छाटणी करावी.बागेची छाटणी करताना जुन्या वाळलेल्या फांद्या, अनावश्यक व दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडाचा मध्यभाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. त्यामुळे पूर्ण झाडास भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. झाडाची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरणे यांच्याशी संबंधित आहे.झाडास मिळणारा सूर्यप्रकाश कमी असल्यास कमी फळधारणा होते.झाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटापर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डोपेस्ट (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी.ज्या भागामध्ये आर्द्रता कमी असते, अशा बागेत झाडाजवळ बाजरीसारखे पीक लावावे. म्हणजे झाडाजवळ योग्य ती आर्द्रता राखण्यास मदत होऊन फळधारणा वाढते.बागेस प्रतिझाड शेणखत ५० किलो व नत्र २५० ग्रॅम, स्फुरद १२५ ग्रॅम व पालाश १२५ ग्रॅम अशी खतमात्रा द्यावी. नत्राची निम्मी मात्रा तसेच स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पहिले पाणी देताना द्यावी. नत्राची उर्वरित मात्रा त्यानंतर ३० दिवसांच्या अंतराने द्यावे. कीड, रोग नियंत्रण : पिठ्या ढेकूण :
झाडाच्या खोडावर १० ते १५ सें.मी. रुंदीची प्लॅस्टिक पट्टी बांधावी. पट्टीच्या वरील बाजूस ग्रीस लावावे. त्यामुळे किडीची पिले त्यावर चिकटून मरतात. आर्द्रतायुक्त हवामानात जैविक बुरशीनाशक व्हर्टीसिलीअम लेकॅनी (फुले बगीसाईड) ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.परोपजीवी कीटक क्रिप्टोलिमस मॉंट्रोझायरीचे १००० ते १५०० प्रौढ भुंगेरे प्रति एकरी सायंकाळच्या वेळी बागेत सोडावेत. आवश्यकता भासल्यास ब्युप्रोफेझीन २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.रोगकारक स्थिती : फळवाढीच्या काळात ढगाळ हवामान व पाऊस आल्यास फळावर रोगाचा प्रादुर्भाव.नियंत्रण : फवारणीबोर्डो मिश्रण १ टक्के (चुना १ किलो अधिक मोरचूद १ किलो प्रति १०० लिटर पाणी)वेळ : फळे सुपारीच्या आकारापेक्षा मोठी झालेली असल्याससूचना : आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. संपर्क : डॉ. सुनील लोहाटे, ९४२२०७१०२८ (अखिल भारतीय समन्वित अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्प, जाधववाडी, जि. पुणे.)