उन्हाळी वातावरणात बागेवर पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
सीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र, उन्हाळ्यात उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यास कीड-रोगमुक्त व दर्जेदार फळांचे उत्पादन मिळते. बाजारात अशा फळांना चांगला दर मिळतो. मात्र, उन्हाळी बहरात फळधारणा खूप कमी प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते.
उन्हाळ्यातील कमी फळधारणेची कारणे :
सीताफळात परपरागसिंचन होत असते. उष्ण व कोरड्या हवामानात मादी फुलांची परागकण धारण करण्याची क्षमता फार कमी कालावधीसाठी असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या होणारे परपरागसिंचन फार कमी प्रमाणात होते. परिणामी, कमी फळधारणा होते.उष्ण व कोरड्या हवामानात आर्द्रतेचे प्रमाण खूपच कमी असते. परिणामी, मादी फुलांची फलनक्षमता कमी होते. तसेच, परागकणांचीही कार्यक्षमता कमी राहते. परिणामी कमी फळधारणा होते.उष्ण व कोरड्या हवामानात उच्च तापमानात फुले करपून जातात. परिणामी कमी फळधारणा होते.बागेत सौम्य तापमान व जास्त आर्द्रता राहावी यासाठी बागेस ४-५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.बागेच्या कडेने हवारोधक झाडांचे कुंपण करावे. परिणामी, बागेत उष्ण वाऱ्याच्या शिरकावाला अटकाव बसून आर्द्रतेत होणारी घट रोखता येते. उन्हाळ्यात बागेची घ्यावयाची काळजी :
उन्हाळ्यात बागेची स्वच्छता करावी. त्यासाठी बागेत पडलेली काळी पाने, रोगट फळे, झाडांवर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून त्यांचा बागबाहेर जाळून नायनाट करावा.बागेमध्ये भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश व खेळती हवा राहील, अशी व्यवस्था करावी. त्यासाठी अनुत्पादक, दाटी-वाटी निर्माण करणाऱ्या फांद्यांची छाटणी करावी.झाडांची खोडे २ ते २.५ फुटापर्यंत मोकळी करून बोर्डो पेस्ट (१० टक्के) लावावी.बहुतांश शेतकऱ्यांनी बागेस खतमात्रा दिल्या आहेत. ज्यांचे खतनियोजन अद्याप राहिले आहे त्यांनी प्रतिझाड शेणखत ५० किलो, नत्र २५० ग्रॅम, स्फुरद १२५ ग्रॅम व पालाश १२५ ग्रॅम अशी संतुलित खतमात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोनवेळा विभागून आत्ता लगेच १२५ ग्रॅम व १ महिन्याने १२५ ग्रॅम अशी द्यावी.अवकाळी पाऊस झाल्यास व हवामान ढगाळ असल्यास बागेवर कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.बागेमध्ये अाच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो. तसेच पाण्यासाठी पिकाची तणाबरोबर होणारी स्पर्धा टाळली जाऊन पाण्याची बचत होते.उन्हाळी वातावरणात बागेवर पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.झाडाच्या आळ्यामध्ये शिफारशीत कीटकनाशकाची भुकटी झाडाच्या आकारमानानुसार जमिनीत मिसळावी.झाडाच्या खोडावर १० ते १५ सें.मी. एवढी लांबी असलेली प्लॅस्टिक पट्टी बांधावी. पट्टीवर वरील बाजूस ग्रीस लावावे. किडीची पिले ग्रीसला चिकटून मरतात.व्हर्टिसिलियम लेकॅनी (फुले बगीसाईड) या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. बागेत आर्द्रता असेल तरच या बुरशीनाशकाचा चांगला परिणाम दिसून येतो. त्यासाठी फवारणी सकाळी ९:०० वाजेच्या आत किंवा संध्याकाळी ५:०० च्या नंतर करावी.आवश्यकता भासल्यास ब्युप्रोफेझिन या कीटकनाशकाची २ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या बागेची काळजी
नवीन झाडांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.झाडांना काठीचा आधार द्यावा. म्हणजे झाडे वाऱ्याच्या दिशेने वाकणार नाहीत.बागेत आर्द्रता टिकून राहण्यासाठी बागेच्या कडेने वारारोधक झाडे लावावीत. त्यामुळे बागे उष्ण वाऱ्याची झुळूक शिरणार नाही.झाडांच्या खोडाजवळ सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.उन्हाळी बहरात फळे वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी .म्हणजे फळे तडकणार नाहीत.योग्य पक्व झाल्यानंतरच फळांची काढणी करावी. संपर्क : डाॅ. सुनील लोहाटे, ९४२२०७१०२८ (अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी, जि. पुणे.)