Solapur Ujani Dam Mud : सोलापूर जिल्ह्यातील सध्या २० टीएमसी गाळ आहे. त्याचा एक वर्षापूर्वी सर्व्हेक्षण होऊन अहवाल शासनाला सादर केला, पण गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. धरणाची क्षमता १२३ टीएमसी आहे, पण गाळामुळे २० टीएमसी पाणी वापरता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे उजनीचा गाळ काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
धरणात अंदाजे १८ ते २० टीएमसीपर्यंत गाळ
यावर सोलापूर जिल्ह्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे म्हणाले की, धरणातील गाळाचा एक वर्षापूर्वी सर्व्हे झाला आहे. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, आगामी काळात गाळ काढण्याची कार्यवाही होईल.
गाळ काढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल व शेतकऱ्यांनाही वेळेवर पाणी मिळेल. त्यातून जिल्ह्याला दुष्काळाची तीव्रता जाणवणार नाही. धरणात अंदाजे १८ ते २० टीएमसीपर्यंत गाळ असल्याची माहिती मोरे यांनी दिली.
उजनी धरण परिसरात होणार पर्यटन
उजनी धरणावरील पर्यटनाचा २८२.७५ कोटी रुपयांचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला. त्याला शासनाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. त्यातील १९०.१९ कोटी रुपये उजनी धरणावरील जलपर्यटनासाठी आहेत. या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, सभागृह, बोर्ड रूम, रॉक पूल, लाइट हाऊस, बोट सफारी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून धरणाची खोली, दरवर्षीची पाणीपातळी, जलसफारी कोठे करता येऊ शकते या बाबींचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासाठी दोन पथके धरणावर आली असून, बोटीतून त्यांचा सर्व्हे सोमवारपासून सुरू होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.