Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : इगतपुरी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

Team Agrowon

Igatpuri News : तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असून, टँकरची गरज भासणाऱ्या गावे व वाड्या वस्त्यांची संख्याही वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या तोकड्या पडत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतीपैकी धारचीवाडी, नाकडवाडी, कोरळवाडी, खडाडवाडी या वांड्यांना गेल्या महिन्यापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

विषेश म्हणजे दोन कोटी रुपयांची जलजीवन योजना मात्र आता शोभेची बनली आहे. एक वर्ष झाले टाकी बांधून ठेवली मात्र पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे रविवारी (ता. १२) महिलांनी पाणी मगणीसाठी थेट सरपंचालाच घेराव घातला. पिण्याच्या पाण्यासाठी अनेक महिला आपला जीव धोक्यात घालून कॅनॉलमध्ये उतरून पाणी आणत आहेत. गावासह वाड्यावर टॅंकरने पाणीपुरवठा करत असल्याने स्थानिक पातळीवर पाणी उपलब्धतेचा प्रश्न सुटलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. तर अनेक पाणी टंचाईचा प्रस्ताव शासनदरबारी धूळखात पडला आहे.

तालुक्यात गत पावसाळ्यात पावसाचे आगार असलेल्या भावली, वैतरणा, वाकीसह शहर परिसरात पावसाने मोठा दगा दिला. मार्चपासून जलसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात झाली होती. याचा विपरित परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. यामुळे तालुक्याला यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार हे आधीच स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनाही राबविण्यात येत असल्या तरी वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबर पाणीटंचाईच्या झळाही पाणीदार तालुक्याला बसत आहे.

अद्याप कडक उन्हाळ्याला महिना बाकी आहे. प्रशासन नियोजन करीत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या कामांमुळे पाणीटंचाई समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. धरण परिसर गावातील नागरिकांना सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मोठी धरणे, लघुपाटबंधारे असतानाही तालुक्यातील गावपाड्यांना दरवर्षी भीषण टंचाई जाणवते.

गावपाड्यांसाठी नळपाणी योजना, कूपनलिका अशा अनेक माध्यमातून पाणीटंचाई निवारणासाठी प्रयत्न केले जात असले तरी मात्र बहुतांश गावांतील पाणीटंचाई दूर झालेली नाही. प्रत्येकवर्षी तेच गाव तेच वाड्या टंचाईग्रस्त असतात. त्यामुळे या ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी पाणी योजना देऊन त्यांच्या डोक्यावरील हंडा कधी जाणार असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

हर घर जलची प्रतीक्षाच...

आदिवासी भागात पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनअंतर्गत योजना पूर्ण होऊन पाणी पोहोचल्याचा दावा केला जातो. मात्र, या मिशनद्वारे पूर्ण झालेल्या योजनेचे पाणी मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सागितले.

जलाशयांनी गाठला तळ

यंदा अत्यल्प पावसामुळे आदिवासी भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उष्ण तापमानामुळे तालुक्यातील जलाशयांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पशूसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT