Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : खानदेशात टंचाई जाणवू लागली

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात या महिन्यात टंचाई जाणवू लागली असून, नदीपात्रात प्रकल्पांतून पाणी सोडून टंचाई दूर करण्याची मागणी पुन्हा एकदा केली जात आहे. मध्यंतरी पांझरा प्रकल्पाचे पाणी नदीत सोडून साक्री, धुळे, अमळनेरातील टंचाई दूर करण्याची मागणी करण्यात आली होती.

गिरणा नदीतूनही तीन वेळेस नदीत पाणी सोडण्यात आले आहे. पुन्हा एकदा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. खानदेशात सातपुड्यातही कमी पाऊस होता. नंदुरबार व धुळ्यात पावसाची २० टक्के तूट राहिली. धुळ्यात वर्षभरात ५६५ मिलिमीटर पाऊस पडतो. नंदुरबारात ८५४ मिलिमीटर दर जळगाव जिल्ह्यात ७६५ मिलिमीटर पाऊसमान आहे.

जळगाव जिल्ह्यातही सुमारे १० टक्के पावसाची तूट होती. काही भागांत चांगला पाऊस झाला, पण काही भागांत पाऊसमान कमी राहीले. सातपुडा पर्वत भागातील १०० पेक्षा अधिक गावे, पाड्यांवर टंचाई जाणवू लागली आहे. कारण पर्वतातील पाणी नाले, नद्यांतून वाहून जाते. यामुळे सिंचनासह पिण्यासंबंधी पाण्याची समस्या तयार होऊ लागली आहे.

नंदुरबारातील सात गावांत सध्या टंचाई अधिक असून टँकरची गरज आहे. धुळ्यातही सुमारे ११ गावांत टंचाई स्थिती गंभीर आहे. जळगाव जिल्ह्यातही पाच गावांत टँकरची गरज आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पारोळा, बोदवड, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा व नंदुरबारातील नंदुरबार तालुक्यात समस्या बिकट बनत आहे.

अनेक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचे स्रोत कमी झाले असून, कूपनलिका, विहीर खोलीकरण, विहीर अधिग्रहण आदी मागण्या येत आहेत. या मागण्या जशा वाढत आहेत, तसा टंचाई आराखड्यावरचा प्रशासनाचा खर्चही वाढणार आहे. तिन्ही जिल्ह्यांत डिसेंबर व जानेवारीत टंचाई आराखडा तयार झाला आहे. आवश्यकतेनुसार टंचाई आराखड्यातील तरतुदीत बदल, वाढ करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली.

जळगावसह धुळे, नंदुरबारातील सर्वच प्रकल्पांतील जलसाठाही घटला आहे. जळगावमधील वाघूर, हतनूर व गिरणा धरणांतील साठा मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे, अशी माहिती मिळाली.

गिरणातील जलसाठा ४१ टक्के

जळगाव जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणातील जलसाठा ४१ टक्क्यांवर आला आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमनसी असून, यंदा हे धरण फक्त ५६ टक्के भरले होते. मागील चार वर्षे त्यात १०० टक्के जलसाठा होता. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यांना त्याचा मोठा लाभ होतो.

२१ हजार हेक्टरवरील रब्बीसही त्यातून पाणी दिले जाते. परंतु यंदा रब्बीस पाणी देण्यात आलेले नाही. फक्त पिण्यासाठी व उद्योगांनाच पाणी दिले जात आहे. तसेच टंचाई दूर करण्यासाठी नदीत तीन वेळेस आवर्तन सोडण्यात आले आहे. चाळीसगाव, पाचोरा व भडगाव नाशिकमधील मनमाड या शहरांनाही या धरणातून पाणी दिले जाते. यामुळे त्यातील जलसाठा झपाट्याने घटला आहे.

जळगावातील विविध प्रकल्पांतील जलसाठा (टक्केवारी)

हतनूर ८६, गिरणा ४१, वाघूर ८४, सुकी ९०, अभोडा ९०, मंगरूळ ८३, मोर ८८, अग्नावती २४, हिवरा ४२, बहुळा ५८, तोंडापूर ७९, अंजनी ४३, भोकरबारी २५, बोरी ३५, मन्याड ००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT