Nashik News : ‘‘जलसंपदा विभागाने शेतीसाठी आकारल्या जाणाऱ्या पाणीपट्टी दरात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. मात्र आमचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी आयोजिलेल्या बैठकीसाठी ते शनिवारी (ता. २२) नाशिक दौऱ्यावर आले होते. राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीचे दर दहापट वाढविले आहेत.
२०१८- १९ मध्ये बारमाही पिकांसाठी पाणीपट्टीचा दर हा स्थानिक करांसह वार्षिक एकरी ५३८ रुपये होता. नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतकऱ्यांसाठी वार्षिक एकरी ५ हजार ४४३ रुपये, खरिपाच्या शेतकऱ्यांसाठी पाणीपट्टी १ हजार ८९०, रब्बीसाठी ३ हजार ७८० रुपये करण्यात आली आहे.
एका झटक्यात दहापट झालेली ही दरवाढ बागायतदार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. ‘‘हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार करेल,’’ असे आश्वासन श्री. शिंदे यांनी दिले.
‘लक्ष्मण हाकेंचे आभार’’
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण १० दिवसांनंतर स्थगित केले. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हाके यांनी आंदोलन मागे घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.