Kolhapur News : ‘‘शक्तिपीठ महामार्गाला आमचा पहिल्यापासून विरोध आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. जोपर्यंत राज्य सरकार शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचे लेखी आश्वासन देत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,’’ असा इशारा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी दिला. सोमवारी(ता.१२) दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आंदोलनाला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी देखील आंदोलनस्थळी भेट दिली. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या वतीने रविवारी (ता.११) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले होते.
हा महामार्ग थांबवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तसे लेखी आदेश काढा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले होते. सोमवारी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
सकाळी १० वाजता जिल्ह्यातील शेतकरी येथे एकत्र जमले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला. या ठिकाणी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी भेट दिली. या वेळी बोलताना खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्ग सुपीक जमिनीतून जातो. यामुळे त्या मार्गावरील शेती आणि शेतकरी संपुष्टात येणार आहे. तसेच या महामार्गाची कोणी मागणीही केली नव्हती.
त्यामुळे सुरुवातीपासूनच आमचा या महामार्गाला विरोध असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आमदार सतेज पाटील यांनी याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. मात्र शक्तिपीठ महामार्ग रद्द करू, असे लेखी आश्वासन शासनाने दिलेले नाही. जोपर्यंत हे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू.’’ यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.