Farmer
Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

कृषिमंत्र्यांच्या गैरहजेरीत शेतकऱ्यांची काळजी घ्या: मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Team Agrowon

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) राज्यात उपलब्ध नसले तरी प्रशासनाने शेतकऱ्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. राज्यातील जिल्हाधिकारी आणि महसूल विभागातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी आज (ता. २४) घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील पीकपाणी आणि पेरण्यांचाही आढावा घेतला.

मॉन्सूनचे आगमन लांबल्यामुळे राज्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारण आणि पाऊस यात नेहमीच अनिश्चितता असते, असे विधान ठाकरे यांनी या बैठकीत केले. शेतकऱ्यांची काळजी घ्या, राजकीय डावपेच चालू राहतील, पण त्यात लोकांची कामं रखडता कामा नयेत. जनतेची कामं माझ्यापर्यंत घेऊन या, अशा सूचना ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी बंड केले. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हेही गुरूवारी (ता. २३) रात्री उध्दव ठाकरे यांची साथ सोडून बंडखोर गटात सामील झाल्याची माहिती आहे. ते आसाममध्ये गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये इतर बंडखोर आमदारांसोबत वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात खरीप हंगामाची गडबड सुरू आहे. बियाणे, खते, पिकविमा याबाबतचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या वेळी कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) राज्यातून गायब झाले आहेत.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळी ट्विट करून कृषिमंत्री भुसे यांच्यावर टीका केली होती. खरीप हंगामात कृषिमंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. मात्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) सध्या आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत, असे ट्विट राऊत यांनी केले होते. त्या पाठोपाठ खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भुसे यांच्या गैरहजेरीची दखल घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सूचना केल्या आहेत.

दरम्यान, कृषी विभागातर्फे मोठा गाजावाजा करून घोषित करण्यात आलेली कृषी संजीवनी मोहीम कृषिमंत्री दादा भुसे यांच्या गैरहजेरीत पार पाडली जाणार आहे. राज्याचे कृषी विस्तार संचालक विकास पाटील यांनी राज्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम कृषी संजीवनी मोहिमेवर होऊ देऊ नका, अशा सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. खरिपात शेतकऱ्यांना कृषिविषयक सल्ला व माहितीची गरज आहे. त्यामुळे मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी कृषी विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले.

“कृषी संजीवनी मोहीम आजपासून राज्यभर ठरल्यानुसारच सुरू होत आहे. या मोहिमेत मंत्री, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी सामील करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र सध्या राज्यातील घडामोडींमुळे राजकीय पदाधिकारी या मोहिमेत उपस्थित राहण्याची शक्यता नाही. मात्र मोहीम यशस्वी करण्यासाठी कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषी शास्त्रज्ञांनी चिकाटीने काम करावे, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत,`` अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT