leaf fall
leaf fall Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Mangnale: उन्हाळ्यातली पानझड

Maharudr Mangnale

उन्हाळा सुरू झालाय. सीताफळाची (Sitaphal) पानं वाळलीत. लवकरच पानझड होईल. त्यामुळं हटकडं येणारा रस्ता भकासवाणा वाटतोय. तसं या दिवसात दरवर्षी दिसणारं हे दृश्य. निसर्गचक्राप्रमाणं निसर्ग बदलत राहातो. या झाडांना माहिताय की, येणारे तीन-चार महिने त्यांना असंच राहायचंय.

नवखा बघणारा म्हणतो, झाडं वाळली वाटतं! मी हसून म्हणतो, त्यांचा उन्हाळा सुरू आहे. जूनचा पहिला पाऊस झाला की, या वाळल्यासारख्या दिसणाऱ्या फांद्या हळूहळू ओलसर होऊ लागतात आणि फांद्यांना हिरवीगार नाजूक पान दिसू लागतात. तिथून त्यांचं जगणं सुरू होतं.

नवनव्या फांद्या, फुलं झपाट्याने वाढू लागतात...आणि एके दिवशी फुलं चमकू लागतात. त्या फुलांची इवली इवली सीताफळं तयार होतात. दिवसागणिक वाढत ती परिपक्व होतात.

ती गोडचुटूक बनतात. आमच्यासह अनेक पक्ष्यांची दिवाळी सुरू होते. दोनेक महिने हा सिलसिला चालतो. हंगाम संपत आला की पुन्हा पानगळ होते... वनस्पतींचं हे चक्र विस्मयकारक आहे.

आमच्यासाठी पाणीटंचाईमुळं उन्हाळा त्रासदायक असायचा. फळझाडं टिकवायची चिंता असायची. प्रसंगी टॅंकरने पाणी आणून घालावं लागलं. तरीही झाडं वाळायची. अस्वस्थ करणारं असायचं हे. पण यावर्षी बागेची चिंता नाही. शेततळं भरलेलं आहे.

मात्र उन्हाळ्यातील वातावरणाचा जो त्रास असतो, तो होणारच. बागेपुरती मर्यादित हिरवाई राहते. पण एवढ्या तीव्र उन्हापुढं ती पुरेशी ठरत नाही. बोअरवेलचं पाणी कमी झालंय. या महिनाअखेरपर्यंत तो कसा तरी चालेल; पण त्याची आता चिंता नाही.

यावर्षी फक्त एक एकरवर जोंधळा पेरलाय. दुसरी रब्बी पेरलेली नाही. सहा एकरपैकी पाच एकरवरील बरू मागेच गाडलाय. सर्वात शेवटी पेरलेल्या एक एकरवरील बरू नीट वाढला नाही. वित-दीड वितच आहे. तरीही दोन आठवड्यात त्याला गाडावंच लागेल.

दीड-दोन वर्षांपूर्वी छोटी-मोठी ४० जनावरं होती. आता फक्त सहा जनावरं आहेत. पाडव्यापासून कदाचित फक्त एक म्हैस आणि एक गाय असेल. जनावरं कमी झाल्याने शेतीतील ताण गेला. आज जनावरं सांभाळणं अशक्य झालं आहे. तरीही सरकार सेंद्रिय शेतीचा आग्रह धरत आहे. हे पुन्हा अब्जावधी रूपये सेंद्रियच्या नावाखाली कोण्यातरी नव्या अदानीच्या पदरात घालणार!

कोणी सेंद्रिय करो, कोणी भरडधान्याची करो की कोणी भाजीपाला, फळबाग, ऊस करो; त्याला माझा विरोध नाही. मी मात्र माझी आनंददायी शेती करणार. त्यात रडण्याला जागा नाही. परिस्थिती कशीही येवो, आम्ही आनंददायीचं जगणार.

त्यासाठी आवश्यक कष्ट करण्याची आमची तयारी आहे. योग्य सालगडी मिळाला नाही तर, त्याच्याशिवाय शेती करायची, हेही आम्ही ठरवलयं. सालगडी ठेवला नाही तर सव्वा लाख रूपये वाचतात. जनावरं ठेवायची नाहीत, हा त्याचाच एक भाग. नाही तरी मी एका सालगड्याची भूमिका बजावतोच.

कमीत कमी जोखमीची पिकं, कमीत कमी गुंतवणूक, झाला तर किरकोळ फायदा, नुकसान झालं तरी ते फार मोठं असणार नाही. पोटासाठी शेती नाही; तर आनंदासाठी, निसर्गात राहण्यासाठी शेती करायची, या धोरणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब. पोटापाण्यासाठी पुस्तक प्रकाशन, वितरण सुरू आहेच. ते बंद करून चालणार नाही.

तो देश, ते सरकार, ते लोक...यांच्याशी देणघेणं नाही. ते कसेही वागले तरी मी माझ्या आनंददायी शेतीत बदल करणार नाही. तेवढा सक्षम मी आता झालेलो आहे.

(लेखक लातूर येथील शेतकरी व पत्रकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT