Remal Cyclone Agrowon
ॲग्रो विशेष

Remal Cyclone : ‘रेमल’चा बांगलादेशला तडाखा

Team Agrowon

Dhaka News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी (ता. २६) मध्यरात्री १२० किमी प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने बांगलादेशला धडकले. वाऱ्यांच्या प्रचंड वेगामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले. वादळाशी संबंधित विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. सकाळनंतर वादळाची तीव्रता कमी झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. या वादळाचा पश्‍चिम बंगाललाही फटका बसला आहे.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार ‘रेमल’ वादळ रविवारी मध्यरात्री बांगलादेशच्या किनाऱ्याला धडकले. सागर बेटापासून १५० किमी अंतरावर हे चक्रीवादळ तयार झाले होते. वादळामुळे पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर पहाटे मुसळधार पाऊस कोसळला.

हे चक्रीवादळ जमिनीवर येताच त्याचा वेग ८० ते ९० किमी प्रतितास इतका कमी झाला. मात्र, या वादळाने किनारपट्टीवरील गावांमध्ये मोठे नुकसान केले. बांगलादेशमधील बारीसाल, भोला, पातुखाली, सातखिरा आणि चटोग्राम या गावांना सर्वाधिक फटका बसला. वादळामुळे, पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने, छत अंगावर पडल्याने आणि इतर काही कारणांनी एकूण मिळून सात जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.

तीव्रता घटली

‘रेमल’ वादळामुळे पायाभूत सुविधांचे बरेच नुकसान झाले. वीजेचे खांब उखडून गेल्याने किनारपट्टीवरील दीड कोटी लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

वादळाची पूर्वसूचना पुरेशी आधी मिळूनही त्याचा सामना करण्याची योग्य तयारी नसल्याने अधिक नुकसान झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ‘रेमल’ हे वादळ उत्तर दिशेला सरकले असून त्याची तीव्रता कमी झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

‘रेमल’ म्हणजे रेती

यंदाच्या मॉन्सून हंगामातील बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘रेमल’ हे पहिलेच चक्रीवादळ आहे. चक्रीवादळांना नावे देण्याच्या पद्धतीनुसार, या वादळाला ओमान या देशाने सुचविलेले नाव देण्यात आले आहे. ‘रेमल’ या शब्दाचा अरबी भाषेत रेती असा अर्थ होतो.

बंगालमध्येही दोन जणांचा मृत्यू

‘रेमल’ चक्रीवादळाचा पश्‍चिम बंगाललाही फटका बसला असून किनारपट्टीवरील अनेक गावांमध्ये वादळामुळे नुकसान झाले आहे. १३५ किमी प्रतितास इतक्या वेगाने वादळातील वारे वाहात असल्याने अनेक घरांची पडझड झाली.

वाऱ्यांमुळे कोलकत्यामध्ये भिंत कोसळून एका व्यक्तीचा, तर सुंदरबननजीकच्या मौसुनी बेटावर एका वृद्ध महिलेचा अंगावर छत कोसळून मृत्यू झाला.

रात्रीतून येऊन गेलेल्या वादळामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता सकाळी उजाडल्यानंतर लक्षात आली. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले होते, तर अनेक रस्त्यांवर झाडे कोसळून मार्ग बंद झाले होते. वीजेचे खांबही उखडून पडल्याने अनेक भागांमध्ये वीज खंडित झाली आहे. वादळामुळे पहाटे तुफान पाऊस कोसळल्याने राजधानी कोलकतासह अनेक शहरांमधील रस्त्यांवर पाणी साचले होते.

कोलकत्यामध्ये उपनगरी रेल्वेवाहतूक तीन तासांसाठी ठप्प झाली होती. वादळामुळे रविवारी दुपारपासून स्थगित केलेली विमानसेवा आज सकाळी पूर्ववत सुरू झाली. वादळानंतर किनारी भागात मदत आणि बचावकार्याला वेग आला असून येथील नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. या मदतकार्यात सतत कोसळत असल्याने अडथळे येत होते.

इतर घडामोडी

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा, नुकसान भरपाई देणार त्रिपुरामधील सेपाहिजाला आणि गुमती या दोन जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी आसाममध्येही जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाला दक्षतेचे आदेश

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT