Sugarcane FRP Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP Raju Shetti : राजू शेट्टींची आक्रोश पदयात्रा उद्यापासून, शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी साखर कारखानदारांच्या दारात

sandeep Shirguppe

Raju Shetti News : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात उद्यापासून (ता.१६) उसाला प्रतिटन दुसरा हफ्ता ४०० रुपये मिळावा यासाठी आक्रोश पदयात्रा काढणार आहेत. शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्यापासून सुरू होणारी ही पदयात्रा तब्बल २२ दिवस चालणार आहे.

५२२ किमीच्या या पदयात्रेत जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखान्याच्या दारात पदयात्रा जाणार आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून सकाळी आठ वाजता या पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.

१३ सप्टेबर रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिटन ४०० रुपये मिळावा आणि राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केल्याशिवाय ऊस गाळपास परवानगी देऊ नये यासाठी भव्य मोर्चा काढला होता. यानंतर गांधी जयंती दिवशी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या दारात ढोल बजावो आंदोलनही करण्यात आले होते. तरीही कारखानदारांनी दुसऱ्या हफ्त्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याने शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढणार असल्याचे सांगितलं.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या पदयात्रेला गावागावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. अनेक गावांमध्ये शेतकरी एकत्र येऊन जोरदार तयारी करत आहेत. पदयात्रेदरम्यान येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जेवण, नाश्ता आणि स्वागताची तयारी करण्यात येत आहे. प्रत्येक गावातून खास भाकरी गोळा करून आंदोलकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे माजी खासदार यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

ही पदयात्रा दत्त, गुरूदत्त, जवाहर, हमिदवाडा, घोरपडे, भोगावती, बिद्री, शाहू, कुंभी कासारी, वारणा, पंचगंगा, शरद, याचबरोबर सांगली जिल्ह्यातील क्रांती, वसंतदादा, राजारामबापू यासह ३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटर निघणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदे ठिकाणी ही पदयात्रा थांबणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला अपयश

नुकतीच दुसऱ्या हप्त्याच्या मागणीप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीत साखर कारखानदारांच्या अडेलतट्टू धोरणामुळे चर्चा फिस्कटली. त्यामुळे माजी खासदार शेट्टी यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारपासून पदयात्रा निघणार आहे.

भाकरी गोळा करून

घरटी भाकरी गोळा करून पदयात्रेत शेतकऱ्यांनी जेवणाची सोय केली आहे. प्रत्येक गावात पदयात्रेचे जल्लोषी स्वागत केले जाणार आहे. जोपर्यंत ४०० रुपयांचा दुसरा हप्ता दिला जात नाही, तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नाही. त्यामुळे पदयात्रेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार शेट्टी यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT