Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्याचा खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. मे महिन्यात लवकर झालेल्या पावसामुळे प्रामुख्याने कर्जत, जामखेड, श्रीगोंदा भागात लवकर पेरणी झालेल्या मूग, उडदाच्या पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे.
एक तर लवकर पेरणी आणि पावसाचा खंड यामुळे ३० ते ४० टक्के क्षेत्रावरील मूग, उडदाचे पीक करपले आहे. तूर, कापसाची वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्याने बाजरी, सोयाबीनसह सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात यंदा मे महिन्यात चांगला पाऊस झाला. जूनमध्येही बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या झाल्या. प्रामुख्याने लवकर झालेल्या पावसामुळे मूग, उडदाची पेरणी झाली. आतापर्यंत जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ७ लाख १६ हजार २०८.६ हेक्टर आहे. त्यापैकी ६ लाख ७४ हजार ६९४.१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
एकूण ९४.२ टक्के पेरणी झाली आहे. अकोले तालुक्यात रोपवाटिका प्रक्षेत्रावर २५८० हेक्टर क्षेत्रावर भात रोपे तयार करण्यात आलेली आहेत. मात्र गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. अधून-मधून पडणाऱ्या रिमझिम पावसाचा अपवाद वगळता सर्वच भागात पाऊस नसल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला आहे.
याशिवाय पावसाच्या खंडाने खरीप पेरणीही गतवर्षीपेक्षा कमी झाली. अहिल्यानगर जूनमध्ये १७७.३ मिलिमीटर इतका झाला. जुलैमध्ये १५४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पावसाची स्थिती
२५ ते ५० टक्क्यांपर्यंत पाऊस ः श्रीरामपूर, पाथर्डी
५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस ः नगर, कोपरगाव, राहाता, जामखेड, शेगाव, नेवासा, राहुरी,
७५ ते शंभर टक्क्यांपर्यंत पाऊस १०० ः संगमनेर, अकोला, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत,
फवारणीचा खर्च महागला
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा भागात कापसावर तुडतुडे, मावा पडला असून काही ठिकाणी कापसाच्या झाडांचे नुकसान होत आहे. श्रीरामपूर, राहुरी, पारनेर, कोपरगाव तालुक्यांत काही ठिकाणी तूर, सोयाबीनला हुमणी अळीचा फटका बसत आहे. शेतकरी कापूस, तूर, सोयाबीनवर फवारणी करत असून यंदा फवारणीचा खर्च पंधरा टक्क्यांनी वाढला आहे. कापूस, तूर, सोयाबीनसह अन्य पिकांवरील रोगांची नुकसानपातळी १० ते १५ टक्क्यांच्या जवळपास असली तरी पाऊस नसल्याने नुकसानीत अजून भर पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
मागील काही दिवसांपासून अत्यल्प व अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झालेला असल्याने पिकांची वाढ खुंटली, कापसात फूलगळ, पातेगळ वाढली, सोयाबीनमध्ये फूलगळ होत आहे. पाऊस नसल्याने फुलांची संख्या कमी झाली आहे. सोयाबीन, उसावरही हुमणी अळी, पांढरी माशी, तपकिरी ठिपके, कापसावर रस शोषणारी किडी, मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसाला तीन वेळा खत देणे गरजेचे आहे. मात्र पाऊस नसल्याने खत देता येत नाही. या साऱ्या बाबीचा पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता दिसतेय.- शैलेश देशमुख, प्रमुख शास्त्रज्ञ, बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर, ता. राहाता
खरीप पिकाला पाऊस कमी मिळाला. त्यामुळे बहुतेक पिकांचे उत्पादन घटणार आहे. गोकूळ आष्टमीनंतर रब्बीच्या पेरण्या सुरू होतात. त्यामुळे शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात उत्तरेपेक्षा दक्षिणेत पाऊस नसल्याचा परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे. दक्षिणेत काही भागात पाऊस बरा आहे.- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर
बऱ्याच भागात अनेक दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला. पाणी उपलब्ध तेथे बरी स्थिती असली तरी पाणी नसलेल्या भागात तुरीच्या उगवण क्षमते, वाढीवर परिणाम झाला. जिरायती भागात कमी दिवसाच्या पिकांवरही परिणाम, उत्पादन परिणाम होईल. कांदा लागवड, पेरणीवर काही परिणाम झाला आहे.- प्रशांत देशमुख, शेतकरी, मांडवगण, ता. श्रीगोंदा
यंदा मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने पाच एकरांत कापसाची लागवड केली. मात्र पावसाचा यंदा बऱ्यापैकी खंड पडला असल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे. यंदा त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.- संभाजी लोढे, शेतकरी, मजलेशहर, ता. शेवगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.