Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rains in Nagpur : अवकाळीने खरिपानंतर रब्बी हंगामही धोक्‍यात

Hail Damage Crops in Nagpur : खरिपानंतर आता रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : खरिपानंतर आता रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला आहे. शनिवारी (ता. ११) विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत गारपीट, पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका बसला. अनेक भागांत पिके आडवी झाली. गहू, काढणीस आलेला हरभरा, तूर, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, कृषी विभागाने मात्र पावसाची तीव्रता तितकीशी नसल्याने आणि गारपीट देखील जास्त झाली नसल्याचे सांगत नुकसानीची तीव्रता प्रत्यक्ष पाहणीनंतरच कळेल, असे सांगितले आहे. अमरावती जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीसुविधा बऱ्यापैकी आहेत. त्यामुळेच या भागात संत्रा, मोसंबी, लिंबू तसेच भाजीपाला व इतर व्यावसायिक पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो.

शनिवारी दुपारी व मध्यरात्री या भागातील चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे व अन्य काही तालुक्यांत पाऊस, गारपीट झाली. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतही गारपीट व पाऊस झाल्याची नोंद आहे. धामणगाव रेल्वे भागात तळेगाव दशासर, देवगाव या भागातील पिकांना सर्वाधिक फटका बसला. चांदूररेल्वे भागात मृग बहारातील संत्रा गळ तसेच आंबिया बहाराचे व्यवस्थापन प्रभावित झाले. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

बांगलादेशाने आयात शुल्कात केलेल्या वाढीच्या परिणामी संत्रा उत्पादकांना गेल्या हंगामात आंबिया बहाराच्या फळांना अपेक्षित दर मिळाला नाही. त्यात आता गारपीट झाल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. भाजीपाला उत्पादकांचेही यामुळे नुकसान झाल्याची माहिती आहे.

परंतु रविवारी (ता. १२) सुट्टी असल्याने प्रशासकीय स्तरावर कामकाज ठप्प होते. या कारणामुळे देखील नुकसानीबाबत स्पष्टता होत नव्हती. शेतकऱ्यांनी मात्र मोठे नुकसान झाल्याचा दावा केला असून सर्व्हेक्षण, पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

ओंबी भरल्याने गव्हाचे पीक वजनदार आहे. त्यामुळे पाऊस आणि गारपिटीने हे पीक आडवे झाले. गव्हाचे नुकसान दिसत असले तरी मृग बहाराच्या संत्रा फळांची झालेली गळ, तसेच आंबिया बहाराचे व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान हे नंतर कळेल. त्यामुळे संत्रा पिकाच्या नुकसानीसाठीच्या सर्व्हेक्षण निकषात शासनाने बदल करावेत.
- नरेंद्र नाल्हे, आमल विश्‍वेश्‍वर, चांदूररेल्वे, जि. अमरावती.
धामणगावरेल्वे तालुक्‍यात ३.४ मिलिमीटर इतका पाऊस झाला. यवतमाळ तसेच अमरावतीच्या काही भागातील पाऊस २ ते ५ मिलिमीटरपेक्षा अधिक नाही. गारपीट देखील तितकी तीव्र नव्हती. तरीसुद्धा काही भागात पाहणीच्या सूचना केल्या आहेत. त्याआधारे नुकसानीचा नेमका अंदाज कळेल.
- किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.
नागपूर विभागात केवळ वर्धा जिल्ह्यात पाऊस, गारपीट झाल्याचे सांगितले जाते. परंतु याची तीव्रता कमी असल्याने फार नुकसान होण्याची शक्‍यता कमीच आहे. तरीसुद्धा पाहणीनंतर स्थिती स्पष्ट होईल.
- मिलिंद शेंडे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT