Solapur News : उजनी धरणातील वाढते जलप्रदूषण हा चिंतेचा विषय बनलेला असतानाही, पुणे परिसरातून भीमा नदीत खळखळत येणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबरच विविध रासायनिक कंपन्यांमधून निघणारे रासायनिक व प्रदूषित पाणी थेट उजनी धरणात येत आहे.
सध्या वरवर स्वच्छ दिसणारे धरणातील पाणी आवक थांबताच प्रदूषणाचा विळखा किती कमी झाला आणि वाढला आहे, हे समजणार आहे. त्यावर संबंधित प्रशासकीय यंत्रणा व सत्ताधारी राजकारणी मंडळी काय उपाययोजना करणार? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुणे जिल्हा परिसर व घाटमाथ्यावर होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. पुढे याच पाण्यावर उजनी धरणही भरून कित्येक दिवस भीमा नदीतून पाणी वाहत होते. यामुळे उजनी धरणातील बहुतांश घाण व प्रदूषण कमी होणार असल्याचे संकेत काही तज्ज्ञांकडून देण्यात आले होते.
वास्तविकरीत्या सातत्याने पाणी वाहिल्याने धरण स्वच्छ होईल, हे स्वाभाविक आहे; परंतु या पूरस्थितीचा गैरफायदा घेत पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखाने, साखर कारखाने लाखो लिटर रसायनमिश्रित सांडपाणी सातत्याने भीमा नदीत सोडत आहेत.
त्यामुळे उजनी जलाशयातील मासे व इतर जलचर प्राण्यांना तसेच लाखो नागरिकांना या प्रदूषणामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. जलाशयाला जलपर्णीचा विळखा पडत आहे. या गंभीर बाबीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित वरिष्ठ यंत्रणा यावर ठोस कार्यवाही का करीत नाही, असा प्रश्न नदीकाठच्या सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.