Chandrpur News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात सामूहिक वनहक्क जमिनीवर व वैयक्तिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर तसेच ग्रामपंचायत सार्वजनिक जागेवर अशा सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, की माझी वसुंधरा अभियानासाठी ८२५ ग्राम पंचायतींनी सहभाग नोंदविला आहे. या अभियानाअंतर्गत भूमी, आकाश, जल, वायू, अग्नी या पाच क्षेत्राअंतर्गत वर्षभर विविध उपक्रम घेणे अपेक्षित आहे. माझी वसुंधराचे निकष पूर्ण करण्यासाठी जून व जुलै महिन्यात ६० हजार १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली.
तर, नरेगाअंतर्गत माझी वसुंधरा अभियानास पूरक शोषखड्डे, नॅडेप व रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा विविध कामांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. १५ ऑगस्टपूर्वी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. बांबू हे पीक लागवडीसाठी अतिशय उत्कृष्ट असून, आर्थिक उत्पन्नाचे साधन बनू शकते. त्यामुळे बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता करणे हा या मागचा उद्देश आहे.
बांबू हे पीक घराचे छप्पर बवनिणे, चटई तयार करणे, टेबल, वाद्ययंत्र, कापड, अगरबत्ती, घरगुती वापरावयाच्या व शोभेच्या वस्तू तयार करण्याठी तसेच इथेनॉल बनविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ज्याचा वापर पेट्रोल तयार करण्यासाठी होतो. चंद्रपूरसारख्या उष्ण तापमाणाच्या जिल्ह्यातदेखील बांबूचे पीक घेता यावे यासाठी शासन स्तरावरून नामांकित रोपवाटिकांतून उच्च प्रतीची गुणवत्तापूर्ण रोपे घेण्यात येत आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बांबूचे उत्पन्न घेणे शक्य होईल.
तसेच शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात नफा मिळेल. जिल्हा परिषद स्तरावरून बांबू लागवडीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याबाबत प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सामूहिक वनहक्क जमिनीवर, तसेच ग्राम पंचायत सार्वजनिक जागेवर, स्मशानभूमी परिसरात, ऑक्सिजन पार्क व वैयक्तीक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर अशी एकूण १० लाख ८५ हजार ५६४ बांबू रोपांची लागवड मग्रारोहयोअंतर्गत करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त लागवडीसाठी सातत्याने तालुकास्तरावर बांबू लागवडीबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. मग्रारोहयोचे उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक आशुतोष सपकाळ हे वैयक्तीक लक्ष देत आहेत.
जिल्ह्यातील वृक्षाच्छादन वाढविण्याच्या अनुषंगाने ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’अभियानाअंतर्गत ही मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत सुमारे अकरा लाख बांबूची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा फायदा घ्यावा.- आशुतोष सपकाळ, उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक, मग्रारोहयो, चंद्रपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.