Solapur News : सीना-कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याबाबत आश्वासन देऊनही पाणी सोडले नाही, या निषेधार्थ आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता. १३) सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली, पण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, तसेच मोहोळ तालुक्यातील शिरापूर, टाकळी, शिंगोली, तरटगाव आदी गावातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी ५ मे रोजी सोलापुरात उजनी सिंचन भवनमधील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते.
त्या वेळी आमदार देशमुख यांनी अधीक्षक अभियंत्यांना पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्या वेळी पाणी सोडण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले. मात्र अद्यापपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे आमदार देशमुख हे स्वतः सिंचन भवन येथे आंदोलनास बसले. या वेळी त्यांच्यासमवेत अनेक शेतकरी उपस्थित होते.
उजनी धरणातून बोगद्याद्वारे सीना नदीत उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडले होते. पण सध्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा १९ झाली आहे. त्यामुळे सीना नदीतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. ऊस व इतर पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. तसेच काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
याकडे आमदार देशमुख यांनी लक्ष वेधले होते. पण तरीही कार्यवाही न झाल्याने आक्रमक होत, त्यांनी निर्णय होईपर्यंत न उठण्याचा निर्णय घेतला. पण दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी त्यांची चर्चा झाली.
त्यात लवकरच पाणी सोडण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी अशोक कांबळे, राम जाधव, विशाल जाधव, संजय वाघमोडे, विशाल जाधव, भागवत लांबतुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.