Chiku Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : चिकू उत्पादकांना सुरक्षा कवच

Fruit Crop Insurance : चिकू फळबागायतदारांना तीन वर्षांनंतर विमा सुरक्षा कवचाचा लाभ घेण्यास सुलभ होणार आहे.

Team Agrowon

Crop Insurance Scheme : चिकू फळबागायतदारांना तीन वर्षांनंतर विमा सुरक्षा कवचाचा लाभ घेण्यास सुलभ होणार आहे. केंद्र व महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या वाट्याचा विमा हप्ता कमी केल्यामुळे डहाणू परिसरातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२०२१ मध्ये पंतप्रधान हंगामी फळपीक विमा योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांना १ जुलै ते ३० सप्टेंबरच्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीतून कोणतेही नुकसान झाल्यास विमा सुरक्षा कवच देण्यासाठी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला कंत्राट देण्यात आले होते; परंतु बागायतदारांच्या वाट्याचा विमा हप्ता परस्पर १८ हजार रुपये वाढवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २०२१ ते २०२३ या तीन वर्षांच्या दरम्यान विमा सुरक्षा कवच योजनेवर बहिष्कार घातला होता. महाराष्ट्र राज्याची उत्पादक संघाने या निर्णयाविरोधात वारंवार सरकारचे लक्ष वेधले होते, मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेऊन दहिसर आमदार मनीषा चौधरी यांनी विधानसभेत या विषयाला वाचा फोडली होती. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून यंदा १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेंतर्गत आता फक्त साडेतीन हजार रुपये हप्ता भरून विमा सुरक्षा कवच घेता येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात चिकू बागायतीचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. त्याचप्रमाणे बाजारपेठांमध्येदेखील चिकू फळांचे बाजारभाव असंतुलित असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा खर्चाचा भार सोसावा लागत आहे, त्यामुळे या विमा योजनेचा मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो.

काय आहे सरकारी योजना?

१ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात सतत आठ दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि २० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास हेक्टरी ७० हजार रुपये, तर सतत चार दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता व २० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास ३१ हजार रुपये नुकसानभरपाई विमा कंपनीने शेतकऱ्याला द्यावयाची आहे. विमा सुरक्षा कवच काळ संपल्यानंतर ६० दिवसांच्या आत ही मदत द्यावयाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची वेळ आल्यास या रकमेचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांना शासकीय विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी व सचिव मिलिंद बाफना खजिनदार यज्ञेश सावे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे यश मिळाले आहे.
- कुणाल माळी, बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT