डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. विजय महाजन
Unseasonal Rain Onion Farming : राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी आणि गारपिटीने पिकांना झोडपलं आहे. त्यामध्ये कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या रब्बी कांद्याची काढणी सुरु असून उन्हाळ कांदा वाढीच्या, तर बीजोत्पादनाचा कांदा बीज भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे वेळीच योग्य फवारण्या आणि नियोजन केल्यास शेतकरी कांद्याचे उत्पादन वाचवू शकतात.
वादळी पाऊस किंवा गारपिटीमुळे नुकसान झालेल्या आणि काढणीला आलेल्या कांद्याच्या शेतातले पाणी लगेच बाहेर काढावे. लवकरात लवकर काढणी लवकर करावी. काढलेला कांदा नीट सुकवून शक्य तितक्या लवकर विकणे फायदेशीर ठरते.
कांद्याची मान पडण्याच्या अवस्थेत पाऊस झाला असेल तर शेतात साचलेले पाणी ताबडतोब बाहेर काढावे. शेत कोरडे झाल्यावर आणि ऊन पडल्यावरच कांद्याची काढणी करावी. काढलेला कांदा पातीसह शेतात ३ ते ४ दिवस उन्हात सुकू द्यावा.
कांदा कापताना सुमारे २ ते ३ सें.मी. लांबीची मान ठेवावी. त्यानंतर कांदे निवडून ३ ते ४ फुट उंचीचे ढीग करून सावलीत सुमारे १५ दिवस सुकवावे. साठवणीसाठी कांदे ठेवायचे असल्यास, हवा खेळती राहील अशा साठवणगृहातच म्हणजे चाळीत ठेवावेत.
कांद्याचे पीक पुनर्लागवडीनंतर ४५ ते ९० दिवसांचे किंवा असेल आणि काही रोपांचे नुकसान झाले असेल, तर योग्य वेळी उपाय करणं गरजेचं आहे. अशा वेळी ट्रायसायक्लॅझोल, हेक्साकोनॅझोल किंवा प्रोपीकोनॅझोल यापैकी कोणतेही बुरशीनाशक १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगांचा प्रसार टाळण्यासाठी ही फवारणी फायदेशीर ठरते.
तसेच पिकाची वाढ सुधारण्यासाठी १९:१९:१९ हे पाण्यात विरघळणारे खत १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे.
जर रोपे पूर्णपणे कोलमडली असतील, तर नत्र : स्फुरद : पालाश : गंधक (२५:२०:२०:१०) हे खत १ हेक्टर क्षेत्रासाठी मातीतून द्यावे. यामुळे पिकाला नवीन जोम येतो आणि वाढ चांगली होते.
बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांदा पिकाला थोडे नुकसान झाले असेल, तर लगेच योग्य उपाय करणे आवश्यक आहे. अशा वेळी ट्रायसायक्लॅझोल, हेक्साकोनॅझोल किंवा प्रोपीकोनॅझोल यापैकी कोणतेही बुरशीनाशक १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकाची वाढ चांगली राहण्यासाठी १९:१९:१९ हे पाण्यात विरघळणारे खत १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून द्यावे. तसेच बियांची गुणवत्ता सुधारण्यासाठी बोरिक आम्ल १.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करणे फायदेशीर ठरते.
जर लावलेल्या कांद्याच्या कंदांना सड येत असेल, तर त्यावर स्ट्रेप्टोमायसिन पावडर ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी (ड्रेंचिंग) करावी. त्यामुळे सड नियंत्रणात येण्यास मदत होते.
वरील उपायांसोबत काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे. पानांवर औषध फवारताना पिकाच्या वाढीनुसार अर्धा ते १ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात चिकटद्रव्य वापरावे, त्यामुळे औषध चांगले चिकटते आणि परिणामही चांगला मिळतो.
जर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ ढगाळ वातावरण असेल, तर पीक चांगले दिसत असले तरीही खबरदारी म्हणून बुरशीनाशकाची फवारणी करावी. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव आधीच टाळता येतो.
फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसल्यास फिफ्रोनिल किंवा प्रोफेनोफॉस २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून चिकटद्रव्यांसह फवारणी करावी. तसेच शेतात साचलेले पाणी लगेच बाहेर काढणेही खूप महत्त्वाचे आहे.
डॉ. शैलेंद्र गाडगे, प्रमुख शास्त्रज्ञ, (९९२२४९०४८३)
डॉ. राजीव काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. विजय महाजन, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.