Shrivardhan News : केंद्र सरकारने प्रत्येकाला पिण्याचे मुबलक पाणी मिळावे म्हणून ‘हर घर जल योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गावात आजही टँकरने पाणी येत आहे. त्यामुळे या योजनेतून नक्की कोणाला फायदा झाला आहे, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
शेखाडी गावात कित्येक वर्षांपासून पाणीटंचाई असते. दहा हजार लिटरचा टँकर मूळ गाव शेखाडी, समर्थवाडी व मोहल्ला या भागात दोन-तीन दिवसांतून एकदाच येतो. त्यामुळे मिळेल ती भांडी भरून ठेवण्यासाठी तारांबळ उडते. दिवसा कोणत्याही वेळी टँकर येतो. त्यामुळे दिवसभर वाट पाहावी लागत असल्याचे गावातील महिला सांगतात.
नुकत्याच राबवलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनेनुसार शेखाडी मूळ गावात १५५ घरे, शेखाडी मोहल्ल्यात ८२; तर शेखाडी समर्थवाडीमध्ये ३३ घरे आहे. शेखाडी गावच्या २७० घरांत साधारणपणे हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. या योजनेतून गावात एकूण २६८ नळ जोडणी दिली आहे; मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता शेखाडी मूळ गावात घरोघरी नळच नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
चार वर्षांत लाखोंच्या योजना
शेखाडी गावात भारत निर्माण योजनेमधून २०१८-१९ मध्ये ३८ लाखांची पाणी योजना राबवण्यात आली. मात्र, त्यातून पाणीटंचाई कमी झालेली नाही. त्यानंतर नुकतीच गावात ६२ लाखांची जलजीवन मिशनची पाणी योजना राबवली, तरीदेखील आम्हाला टँकरमधून पाणी मागवावे लागते, असे ग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.