Jalgaon News : जळगाव ः खानदेशात अक्षय्य तृतीया म्हणजेच आखजीला परंपरेनुसार सालगड्यांचा मेहनताना ठरणार आहे. पण कापूस पीक प्रमुख आहे. तसेच कमाल क्षेत्र कोरडवाहू आहे. पण कोरडवाहू व कापूस शेती समस्यांनी संकटात असल्याने सालगड्यांच्या मेहनतान्यात वाढ होणार नाही, असे दिसत आहे.
सालगडी मेहनताना दर वर्षी वाढत आहे. पण शेती तोट्यात आल्याने समस्या अधिक बनल्या आहेत. नवर्षाला व अक्षय्य तृतीयेस आपल्या शेतीकामासाठी सालगडी नेमण्याची परंपरा आहे. अर्थात यंदाही गावोगावी सालगडी नेमले जातील, त्यांचा मेहनताना काय, हेदेखील स्पष्ट होईल. पण कापूस शेती तोट्यात आली आहे. शिवाय यांत्रिक शेती वाढली आहे. पशुधन घटले आहे. यामुळे सालगडींची संख्या शेतकरी कमी करतील, अशी स्थिती आहे.
अनेक शेतकरी महिनदार किंवा आवश्यकतेनुसार मजुरांची शेतीकामासंबंधी मदत घेऊ लागले आहेत. कारण सालगडी मेहनताना व त्याचा अन्य खर्च परवडणारा नाही. यातच बैलजोडीकरवी फारशी आंतरमशागत, वाहतुकीची कामेही मोठे, मध्यम शेतकरी करीत नाहीत. यामुळे सालगड्यांची संख्याही शेतकऱ्यांनी कमी करण्यावर भर दिला आहे. जेथे पूर्वी चार ते पाच सालगडी असायचे, तेथे आता दोनच सालगडी दिसतात.
अनेक शेतकरी गुढीपाडव्याला किंवा नवर्षाला आपल्या शेतात सालगड्याची नेमणूक करतात. तर काही शेतकरी अक्षय्य तृतीयेस सालगडी नेमतात. मोठे शेतकरी आपल्या सालगड्याचे अस्थायी निवासस्थान, वर्षभराचे धान्य आदी व्यवस्थाही करतात. ८० हजार ते ९० हजार रुपये प्रतिवर्ष किंवा १२ महिन्याच्या कामासाठी हा मेहनताना सध्या दिला जात आहे. परंतु यंदा हा मेहनताना अनेकांना वाढणार नाही, असे दिसत आहे. कोरडवाही किंवा हंगामी बागायती शेती खानदेशात अधिक आहे.
बारमाही बागायती शेती फारशी नाही. त्यात कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. एकूण खरिपातील ६० ते ६५ टक्के क्षेत्रात कापूस पीक असते. हे क्षेत्र खानदेशात एकूण साडेआठ लाख ते नऊ लाख हेक्टरवर असते. त्यापाठोपाठ तृणधान्य पेरणी केली जाते. परंतु मागील वेळेस दुष्काळ होता. यंदा ओला दुष्काळ आला. याचा फटका शेती व शेतकऱ्यास बसला. शेतीचा खर्च निघाला नाही. त्यात सालगडी मेहनताना परवडला नाही. यामुळे सालगडी मेहताना व त्यांची नियुक्ती याबाबत फारशी उत्सुकता यंदा खानदेशात नाही.
सालगडी मिळणेही दुरापास्त
खानदेशात आदिवासी बहुल क्षेत्रातील म्हणजेच सातपुडा पर्वत भागातील अनेक जण सालगडी म्हणून नियुक्त केले जातात. स्थानिक क्षेत्रात सालगडी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यात अनेकदा फसवणूक होते, सालगडी पैसे घेऊन रातोरात पसार होतात, यामुळे प्रामाणिक, ओळखीच्या मंडळीकडून सालगड्यांची नियुक्ती करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. त्यात प्रामाणिक सालगड्यांची संख्या कमी झाली असून, कामसू, चांगले सालगडी दुरापास्त असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.