Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : उजनी पाणलोट क्षेत्रावर दुष्काळाचे सावट

Team Agrowon

Pune News : पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात शंभर टक्के पाणीसाठा असलेल्या धरणात यंदा केवळ १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यातही आगामी सहा महिन्यांत नदी, कालवा, पाणी योजनांव्दारे तीन आवर्तने सोलापूर जिल्ह्याला देणे निश्चित असल्याने, यंदा धरण कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणलोट क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पुणे व नगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उजनीच्या पहिल्या आवर्तनानंतर मार्च व मे महिन्यात सोलापूर जिल्ह्याला पाणी दिले जाणार आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण ६० टक्के (९५ टीएमसी) भरले होते. यामध्ये ६३ टीएमसी मृत पाणीसाठा तर ३२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यापैकी आतापर्यंत २४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या केवळ १५ टक्के उपयुक्त साठा म्हणजे आठ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.

तर आगामी सहा महिन्यांमध्ये सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची, शेतीची व औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज भागविणे तारेवरची कसरत ठरणार आहे. धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्यावर गदा न आणता सोलापूरला पाणी देण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.

धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा पट्टा मोठा असून, सुमारे सहा किलोमीटरहून अधिक रुंदी व १४० किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर सुमारे चाळीसहून अधिक सहकारी व खासगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक व्यवसाय अवलंबून असल्याने, दरवर्षी ३० हजार कोटींहून अधिकची उलाढाल होते.

धरणाच्या मागील काही वर्षांच्या नोंदीवर नजर टाकल्यास सन २०१०, २०१८, २०२० ते २०२२ या वर्षांमध्ये जानेवारीमध्ये धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. यंदा मात्र धरणातील पाणी पातळीने शंभर टक्क्यांचा टप्पा गाठला नाही. तर जानेवारी, मार्च व मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यासाठी संभाव्य आवर्तन दिली जाणार आहेत.

एका आवर्तनासाठी सहा टीएमसी पाणी आवश्‍यक

नदीतून पाणी देण्यासाठी एका आवर्तनासाठी सुमारे सहा टीएमसी पाण्याची आवश्यक असते. एकंदरीत पावसाळ्यापर्यंत आवर्तनाचा विचार केल्यास मृत साठ्यातील सुमारे ६० टक्के म्हणजे ३० टीएमसीहून अधिक पाणी वापरले जाणार आहे. उरलेल्या पाणी साठ्यातून सुमारे पाच टीएमसी गाळाचे प्रमाण वजा केल्यास उरणारे पाणी केवळ बघत बसण्याची वेळ धरणग्रस्त शेतकऱ्यांवर येणार आहे.

धरणातील पाण्यापैकी धरणग्रस्तांसाठी उपयुक्त साठ्यातील ९.६० टीएमसी पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. धरणातील मृतसाठा वगळता उपयुक्त साठ्यातील धरणग्रस्तांच्या वाट्याचे पाणी वगळून पाणी वाटपाचे नियोजन गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पावसाळ्यानंतर धरणातील पाणी बेकायदेशीरपणे नदीतून सोडले जाते. परिणामी उन्हाळ्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मोठी परवड होते.
- अरविंद जगताप, तालुकाध्यक्ष, उजनी धरणग्रस्त बचाव कृती समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT