Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Drip Water Management : आडसाली उसासाठी ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन

अरुण देशमुख

भाग  १

Sugarcane Farming Water Management : आडसाली हंगामातील ऊस लागवड जुलै ते ऑगस्ट महिन्यात केली जाते. या पिकासाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते, फुटवे कमी निघतात. उसाची उंची तसेच कांड्याची लांबी वाढणे जरुरीचे आहे, कारण कांडीत साखर साठवली जाते, वजन वाढते. ऊस तोडण्याच्या अगोदर १५ ते २० दिवस पाणी देणे थांबविल्यास साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

उगवणीची अवस्था

उगवणीच्या अवस्थेमध्ये आणि कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे आहे.

सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे. जमिनीत हवा खेळती असावी.

सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते, त्यामुळे उगवण उशिरा होते.

शेतात पाणी साचल्यास डोळे कुजतात. उगवून आलेले कोंब मरतात, उगवणीचे प्रमाण कमी राहते. यामुळे अपेक्षित ऊस संख्या मिळत नाही.

फुटवे फुटण्याची अवस्था

जमीन वाफशावर राहील एवढेच पाणी दिल्यास, लवकर व भरपूर फुटवे फुटतात. त्यामुळे शेतात एकसारखे ऊस तयार होतात. अपेक्षित उसाची संख्या मिळणे शक्य होते.

या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण बसल्यास फुटवे कमी निघतात, आलेले फुटवे मरतात. ऊस संख्या कमी मिळाल्यामुळे उत्पादन कमी येते.

जास्त पाणी दिल्याने मुळांशी हवा राहत नाही, फुटवे फुटण्यावर अनिष्ट परिणाम होतो. फुटव्यांच्या वाढीवर परिणाम होतो.

जोमदार वाढीची अवस्था

उत्पादनवाढीच्या अवस्थेमध्ये योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा करावा. या अवस्थेमध्ये उंची, कांड्यांची लांबी, जाडी वाढत असते. याचा प्रत्यक्ष परिणाम वजन वाढण्यावर होतो. याच अवस्थेमध्ये कांड्यामध्ये साखर साठविण्याचे कार्य सुरू असते. या कालावधीमध्ये उसाची पाण्याची गरज ही सर्वोच्च असते.

या कालावधीमध्ये वाढणाऱ्या कोंबाकडील भागामध्ये ओलाव्याचे प्रमाण जर ८५ टक्के दरम्यान असेल तर कांड्याची लांबी, जाडी वाढून वजन झपाट्याने वाढते.

पाण्याचा ताण पडल्यास कांड्या एकदम आखूड होतात, उंची खुंटते.

पाण्याचा ताण जोमदार वाढीच्या शेवटच्या टप्प्यात पडल्यास पक्वता लवकर येते आणि उत्पादन घटते.

लागण पिकामध्ये पाण्याचा ताण पडल्यास, खोडवा पिकावर परिणाम होतो.

पक्वतेची अवस्था

या कालवधीत पिकास थोडा पाण्याचा ताण दिल्यास उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. या कालावधीमध्ये वाढणाऱ्या कोंबाकडील भागामध्ये ओलाव्याचे प्रमाण ७४ ते ७६ टक्के असावे.

भरपूर पाणी दिल्यास शाकीय वाढ सुरू राहते, साखर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. पाण्याचा जास्त ताण पडल्यास वाढ खुंटते, साखर उत्पादन कमी होते.

कमी पाण्यामुळे जमिनीस भेगा पडल्यास मुळांची वाढ खुंटते.

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२

(उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT