ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News : पुनवत, जि. सांगली ः ‘‘शिराळा तालुक्यात पावसाळ्यात पडलेला सरासरीहून अधिक पाऊस व दरम्यानच्या काळात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ४९ पैकी ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून शेतकऱ्यांना चालू रब्बी हंगामासाठी अप्रत्यक्ष सिंचनाद्वारे चांगला लाभ होणार आहे.
या सिंचनाचा लाभ लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना व्हावा वा थेट पंप टाकून किंवा सायफन पद्धतीने पाणी उपसा करू नये, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांसह नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे,’’ असे आवाहन केल्याची माहिती शिराळा उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण तेली यांनी दिली.
प्रवीण तेली म्हणाले, ‘‘तालुक्यात गतवर्षी पाण्याअभावी ५० टक्के क्षेत्र मोकळे पडले होते. मात्र लघुपाटबंधारे उपविभागांतर्गत पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे व वळण बंधारे सद्यःस्थितीत चालू हंगामासाठी पाणीसाठा समाधानकारक आहे. मेपर्यंत पाणीसाठा कसा पुरवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यातील ११ सिमेंट बंधाऱ्यांचे गेट्स त्वरित बसविण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत व पाणी वापर संस्था यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतीने ते केले तर सर्वांचा लाभ होईल.’’
ते म्हणाले, ‘‘लघु पाटबंधारे उपविभागांतर्गत ४९ पाझर तलावांतील पाणी साठवण क्षमता २३६.४१ दश लक्ष घन फूट असून सद्यःस्थितीत पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्यामध्ये २०८.२८ दश लक्ष घन फूट इतका पाणी साठा उपलब्ध झाला आहे. सर्व तलावांची सिंचन क्षेत्र क्षमता १ हजार ६५९ हेक्टर आहे. तालुक्यामध्ये ११ सिमेंट नाला बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.
या बंधाऱ्यांतील पाणी साठवण क्षमता ४.५२ दश लक्ष घन फूट असून सद्यःस्थितीत ४.४२ दश लक्ष घन फूट पाणीसाठा उपलब्ध आहे. या सर्व सिमेंट बंधाऱ्यांची सिंचन क्षेत्र क्षमता ४८.९७ हेक्टर आहे. तालुक्यामध्ये ५० वळण बंधारे असून त्यांची सिंचन क्षेत्र क्षमता १ हजार ०८७ हेक्टर आहे. हे सर्व पाटबंधाऱ्यांच्या प्रकल्पामधील पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी अप्रत्यक्ष सिंचनाद्वारे होणार आहे. शेतकरी, तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.’’
दोन्ही तलावांमध्ये मृत पाणीसाठा
तालुक्यातील करमाळे नंबर १ व पाचुंब्री पाझर तलावाचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्याचे दुरुस्तीचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत या दोन्ही तलावांमध्ये मृत पाणीसाठा झाला आहे. चालू वर्षी पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नियमित मॉन्सूनच्या कालावधीमध्ये अनेकदा अतिवृष्टी व नंतर परतीचा पाऊस झाल्यामुळे ४७ पाझर तलावांतून सलग ३ वेळा अतिरिक्त पाणी सांडव्यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे या पाणीसाठ्याचा तलावांच्या खालील बाजूस असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी तसेच रब्बी हंगामाकरिता अप्रत्यक्ष सिंचनाद्वारे उपयुक्त ठरणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.