Nilvande Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Nilvande Dam : निळवंडेचे पाणी सिन्नरसाठी मृगजळच ; राधाकृष्ण विखे-पाटलांकडून वाटाण्याच्या अक्षता

Team Agrowon

Nashik News : यंदा पावसाने पाठ फिरविल्याने टंचाईच्या झळा सोसणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सहा गावांतील शेतकऱ्यांसाठी निळवंडे कालव्याला सोडलेले आवर्तन मृगजळ ठरले आहे. संगमनेर तालुक्यातील देवकवठेत पाणी पोहोचल्यावर जलसंपदा विभागाने आवर्तन थांबविले. आवर्तन पुढचे काही दिवस सुरू ठेवावे आणि सिन्नरच्या पाथरे वारेगावपर्यंत नदी मार्गाने पाणी द्यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे यांनी अहमदनगरचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, विखे-पाटील यांनी पोकळ आश्वासन देत लोकप्रतिनिधींना वाटाण्याच्या अक्षदा लावल्याची भावना सिन्नरमधील शेतकऱ्यांची आहे.

अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यात प्रवरा नदीवर बांधलेल्या निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात सिन्नर तालुक्यातील मलढोण, सायाळे, दूसंगवाडी, पाथरे खुर्द व बुद्रुक व वारेगाव या गावांचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यातील तळेगाव शाखेवर देवकवठेपर्यंत चारीचे काम झाले आहे. तेथून पुढे सिन्नर तालुक्यात पाणी वितरित करण्यासाठी चाऱ्यांची कामे कागदावर आहेत. यंदा निळवंडे धरणातून लाभक्षेत्रात पाण्याची आवर्तन सोडले. हे पाणी सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना मिळाले असते, तर टंचाईच्या झळा काहीअंशी कमी झाल्या असत्या.
सिन्नर तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाणीप्रश्न गंभीर आहे.

निळवंडेचे पाणी पशुधनासाठी फायदेशीर ठरले असते. चिंचोली गुरव देवकवठे या संगमनेरच्या गावातून वाहणारी शिव नदी मलढोण, सायाळेमार्गे पाथरे वारेगावपर्यंत वाहते. देवकवठे येथील बंधाऱ्यात निळवंडेचे पाणी आल्यानंतर ते पुढे नदी मार्गाने पाथरेपर्यंत मिळावे, अशी मागणी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची होती. याबाबत खासदार हेमंत गोडसे, माणिकराव कोकाटे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यकडे विनंती केली होती. विखे पाटील यांच्या भेटीसाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जाऊन आले. त्यांना केवळ आश्वासन देत विखे पाटलांनी माघारी पाठविले आणि दुसऱ्याच दिवशी देवकवठेपर्यंत पाणी पोहोचल्यावर आवर्तन अन्यत्र वळविले.

आता नाही,तर पुन्हा नाही...


निळवंडेचे पहिल्या आवर्तनाचे पाणी सिन्नरच्या लाभक्षेत्रात मिळाले नाही, तर पुन्हा कधीच हे पाणी मिळणार नाही. भोजापूरच्या पूरपाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तीच वेळ निळवंडेच्या पाण्यासाठी पूर्व भागातील शेतकऱ्यांवर येणार आहे. सिन्नरच्या लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांनी एकत्र येऊन या पाण्याचा लाभ कार्यक्षेत्रात मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपसातील मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा प्रत्येक खेपेला देवकवठेपर्यंत पाणी मिळेल आणि सिन्नरचा शेतकरी आशाळभूतपणे पाणी येण्याची वाट बघत बसेल. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव, जवळके भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी निळवंडेच्या आवर्तनाची पाणी वळविल्याची चर्चा आहे. आमदार काळे स्वतः तळेगाव येथे रांजणगावकडे पाणी सोडण्यासाठी कालव्यावर उपस्थित होते.

पाण्यासाठी संघर्ष करावाच लागेल

सिन्नरच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांसाठी निळवंडेचे पाणी वरदान ठरू शकते. देवकवठे येथून नदी मार्गाने का होईना पाणी मिळाले पाहिजे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागणार आहे. नगरचे मातब्बर पुढारी त्यांच्या कार्यक्षेत्रात शेवटच्या गावापर्यंत पाण्याचा लाभ देतील. हक्काचे पाणी सिन्नर तालुक्यातील गावांना मिळाले पाहिजे, ही तळमळ केवळ बोलून चालणार नाही, तर त्यासाठी कृतीची जोड द्यावी लागणार आहे.

मलढोन, सायाळे गावांची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे निळवंडेचे आवर्तन आणखी चार दिवस सिन्नरसाठी द्यावे, अशी मागणी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली होती. विखे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना माझ्या समक्ष सिन्नरला पाणी सोडावे, अशी सूचना केली. निळवंडेचे सिन्नरच्या गावांसाठी असलेले हककाचे पाणी प्रत्येक आवर्तनाला मिळालेच पाहिजे, अन्यथा प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करण्याची माझी तयारी आहे.
- माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या २५ टक्के अग्रिमसाठी अधिसूचना

Flower Market : शेवंती, झेंडूचा भाव वधारला

Ativrushti Madat : ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर;  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

SCROLL FOR NEXT