Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : गव्हाचा चीक अन् मिरचीची झाली राखरांगोळी

Unseasonal Rain : काय सांगावं तुम्हाला आधी पानकळात पाऊस नव्हता म्हणून पिकं गेली अन्‌ आता पाऊस आला म्हणून पिकं गेली. दोन एकरांत जेवढा गहू पेरला तेवढा उगवलाच नाही.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : काय सांगावं तुम्हाला आधी पानकळात पाऊस नव्हता म्हणून पिकं गेली अन्‌ आता पाऊस आला म्हणून पिकं गेली. दोन एकरांत जेवढा गहू पेरला तेवढा उगवलाच नाही. त्याचा पुरा चीक होऊन गेला. दोन एकरांतल्या मिरचीची, तर तिसरा तोडा सुरू व्हायचा असतानाच राखरांगोळी झाली.

खरीप अन्‌ रब्बी मिळून किमान चार लाख खर्च झाले. त्यातले फक्‍त दीड लाख मिरचीचे अन् २५ हजार कापसाचे हाती आले. आता पुन्हा पेरणी करायची म्हटलं तं खर्च आलाचं ना. हातात पीक नाही मग खर्च करायचा कुठून, अशी उद्विग्न भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

गंगापूर तालुक्‍यातील गुरुधानोरा येथील बाळू रावसाहेब जंजाळे त्यांच्या साडेपाच एकर शेतीची आधी खरिपात पाऊस नसल्याने आणि‌ आता पाऊस आल्याने झालेल्या नुकसानीची व्यथा मांडत होते. या वेळी गुरुधानोराचे उपसरपंच दिलीप काजळे, साईनाथ आमले, बद्रीनाथ चिडे, दत्ता पवार हे शेतकरीही झालेल्या नुकसानीची दैन मांडली.

बाळू जंजाळे म्हणाले, की आमच्या कुटुंबाकडे साडेपाच एकर शेती. शिवाय ७ एकर ठोक्‍याने, तर ४ एकर बटाईने केली. ठोक्‍याने केलेल्या शेतीत कपाशी होती ती संपली त्यात आता कांदे लावतोय. तर बटाईच्या शेतात आधी मका होती आता दोन एकर गहू पेरला.

पाऊस सुरू होण्याआधी साधारणतः तीन दिवस आधी पेरणी झाली. इतका पाऊस झाला, की पेरलेला गहू ढापल्या गेला. आता उगवलेला दिसतो तो ठेवून उपयोग नाही. घरच्या पाच एकरांत अन् आताच्या ठोक्‍या बटईने केलेल्या शेतीचा मिळून जवळपास ४ लाख रुपये खर्च झाला. हातात फक्‍त दोन तोड्यांत मिरचीला ७ हजारांच्या आसपास प्रतिक्‍विंटलचा भाव मिळाल्याने आलेले दीड लाख आणि कापसाच्या विक्रीतून आलेले २५ हजार एवढेच आले. म्हणजे खर्च वसूल नाही.

आता दोन्ही हंगामांतील पीक नाहीत. पुन्हा पेरणी करायची म्हटलं तर पैसा नाही आणि‌ बियाणे मिळले का नाही माहीत नाही. मिळाले नाही तर जिथं असलं तिथून जादा दर मोजून आणावे लागेल. म्हणजे खर्च आला, तो करायचा कुठून हा प्रश्‍न आहे. यंदा खरिपाची पिके गेली बागायती चार ते पाच क्विंटल पुढे कापूस पिकला नाही. कोरडवाहू तर एक ते दोन क्विंटलच्या आतच राहिला.

गेली मिरची....

मिरचीचा पहिला दुसरा तोडा जास्त नसतो. पण दर चांगला मिळाल्याने दोन तोड्यांत जवळपास दीड लाख मिळाले. तिसऱ्या तोड्याच्या वेळी एका झाडाला किमान पाउण किलो मिरच्या असतील. मिरचीचा प्लॉट पाहून व्यापाऱ्याने ५ लाखांत उक्‍ती मागितली. पण दिली नाही, वाटले इतर कोणतचे पीक हाती नाही, मिरची तरी उणीव भरून काढले. पण झाले उलटंच वादळासह पाऊस आला.

त्यात मिरची लगडलेली झाडे आडवी झाली. पाऊस तीन दिवस सतत सुरू असल्याने पडलेल्या झाडाच्या मिरच्या सडल्या. हातात फक्‍त बऱ्या असलेल्या २० क्‍विंटल मिरच्या लागल्या. त्यालाही मार असल्याने दर अडीच तीन हजारांचे मिळाला, शिवाय प्लॉटही संपला. किमान ७० क्‍विंटल मिरची झाली असती. सोबतच मिरचीपासून किमान ७ लाख रुपये उत्पन्न मिळाले असते. पण गेल्याचे बाळू जंजाळे सांगत होते.

गहू पेरला त्यासाठी २० हजारांवर खर्च झाला. तो गेला शिवाय आधीच उत्पादन घटलेला ऊसही आडवा झालाय. मोठं नुकसान पावसाने केले.
- दत्ता पवार, शेतकरी
चार एकर कापूस होता. सहा, सात क्‍विंटल घरात आला बाकीचा वेचायचा बाकी होता. किमान दहा बारा क्‍विंटल आला असता, पण तो भिजला. आता काहीच नाही.
- दिलीप काजळे, शेतकरी
आधी पावसाअभावी कपाशीच नुकसान झाल. दहा क्‍विंटल कापूस आला फक्‍त. आता वादळी पावसाने ऊस आडवा झाला.
- साईनाथ आमले, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT