Dhule News : गेल्या वर्षी वेळेवर पाऊस आला नाही. त्यामुळे हाती काही लागले नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही बरीच भटकंती करावी लागली. दुष्काळाने होरपळून काढले. यंदा धो-धो बरसतोय. थांबायचे नाव घेत नाही. गेल्या वर्षाची कसर तू अशी भरून काढशील, हे आम्हाला माहीत नव्हते.
तू किती नुकसान करशील रे बाबा..? तू तर आमचा पुरता जीव घेतोय. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेतोय. आता एकदाचा जीव घे आमचा. आभाळच फाटलंय, सांगा कसं जगायचं, असा उद्विग्न सवाल परिसरातील शेतकरी पावसाला करीत आहेत.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धुव्वादार पाऊस झाला. त्यानंतर ९ ऑक्टोबरला पुन्हा दहा दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन झाले. १३ सप्टेंबरपर्यंत रोज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले. आता पुन्हा पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाले.
पावसाळा संपून दोन आठवडे झाले. तिसरा आठवडा अर्ध्यावर आला आहे. तरीही परतीचा पाऊस माघार घ्यायला तयार नाही. २१ सप्टेंबरपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
आता तरी पाऊस माघार घेईल. बंद होईल. या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमधून पुन्हा निराशा व्यक्त होत आहे. आता तर पावसाची दोन मिनिटाची हजेरीही खरीपाचे मोठे नुकसान करीत आहे. सलग पाचव्या महिन्यात सातत्यपूर्ण पाऊस होत आहे. मका, ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे खूप मोठे नुकसान होत आहे.
सततच्या पावसाने खरीपाची कमाई पूर्णपणे कोलमडली आहे. शासन-प्रशासनाने ओला दुष्काळ घोषित करावा. प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घोषित करावी. तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.