Climate change  Agrowon
ॲग्रो विशेष

Climate change : हवामान बदलाचा देशातील ६० टक्क्यांहून अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना फटका; उत्पादन घटलं!

हवामान बदलामुळे केवळ अन्नसुरक्षेचं संकट निर्माण होणार असं नाही तर अल्पभूधारक शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्नात घट येण्याची चिन्हं आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळं भात पिकाचं शेतातच ५० टक्के उत्पादन घटलं. तर गहू पिकाचं उत्पन्न ४२ टक्क्यांनी घटलं.

Dhananjay Sanap

पावसाच्या असमान वितरणाची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये भात, मका, कापूस, सोयाबीन, भुईमग आणि कडधान्याची लागवड कमी पावसामुळे लांबणीवर पडते. त्यामुळे जुलैच्या मध्यानंतर लागवड केली तर उत्पादनात घट येत असल्याचं निरीक्षण एका अभ्यासात मांडण्यात आलं आहे. द फोरम ऑफ एंटरप्रायझेस फॉर इक्विटेबल डेव्हलपमेंट (FEED), डेव्हलपमेंट इंटेलिजेंस युनिट (DIU) यांनी मंगळवारी (ता.२६) 'शेतकऱ्यांवरील हवामान बदलाचा प्रभाव' या शीर्षकाचं संशोधन प्रसिद्ध केलं आहे. या अभ्यासात मागील पाच वर्षात हवामान बदलाचा देशातील ६० टक्क्यांहून अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये उत्पादकतेमधील घट मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहे.

शेतीच्या विविध कार्यात हवामान बदलाचा काय परिणाम झाला, याची माहिती एकत्र करून त्यावर आधारित निरीक्षणं या अभ्यासात नोंदवण्यात आले आहेत. त्यासाठी २० राज्यातील ६ हजार ६१५ शेतकऱ्यांची नमुना म्हणून निवड करण्यात आली होती. देशातील ४०.९ टक्के शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. तर ३२.६ टक्के शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटानं जेरीस आणलं, असंही सांगण्यात आलं आहे. या दोन्ही आपत्तीमुळे पिकाचं अतोनात नुकसान झाल्याचं निरीक्षण अभ्यासात नोंदवण्यात आलं.

हवामान बदलामुळे केवळ अन्नसुरक्षेचं संकट निर्माण होणार असं नाही तर अल्पभूधारक शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्नात घट येण्याची चिन्हं आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळं भात पिकाचं शेतातच ५० टक्के उत्पादन घटलं. तर गहू पिकाचं उत्पन्न ४२ टक्क्यांनी घटलं. त्यामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसल्याचं दिसतं, असं या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

देशातील शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळावं, त्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत. आणि शेतकऱ्यांना शेती कर्ज पुरवठा अधिक गतीनं व्हावा, असं जाणकार सांगतात. पीकविमा आणि कर्जपुरवठ्याबद्दलची धक्कादायक माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. देशातील ३० टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण मिळतं. तर फक्त २५ टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत असल्याची माहिती अभ्यासात मांडण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज, विमा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीचा वापर करावा. तर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून हवामान बदलापासून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान बदलाचा फटका शेती क्षेत्राला सर्वाधिक बसत आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं आहे. गेल्या दोन वर्षात उष्णतेच्या लाटांनी शेती क्षेत्राला तडाखा दिला. तर अनेक भागात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. त्यामुळे शेती क्षेत्रासमोर हवामान बदलांचं आव्हान अधिक गंभीर झालं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT