Amaravati News : सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गत हंगामात झालेल्या नुकसानीपोटी करण्यात येत असलेल्या अर्थसाह्यात केवायसी करताना ओटीपी मिळत नसल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत.
संकेतस्थळ मंदगतीने चालत असल्याने ही समस्या निर्माण झाली असून लाभार्थ्यांना वेबसाइट प्रतिसाद देत नसल्याचे संदेश मिळू लागले आहेत. जिल्ह्यातील ५८ हजार ७१५ शेतकऱ्यांची ई-केवायसी यामुळे होऊ शकलेली नाही. परिणामी त्यांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
गत खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती व बाजारात मिळालेले कमी दर, यामुळे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने भावांतर योजनेअंतर्गत ०.२० ते दोन हेक्टरच्या मर्यादेत एक हजार ते पाच हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली आहे.
ही मदत ई-पीक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार असून त्यासाठी त्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. अमरावती जिल्ह्यात ३ लाख ५३ हजार ६८३ पैकी २ लाख २४ हजार ७६१ शेतकऱ्यांची नोंदणीचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. यातील १ लाख ६६ हजार ४६ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असली तरी ५८ हजार ७१५ लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नाही.
शेतकऱ्यानी ई-केवायसीसाठी सेतूकेंद्र व कृषी सहायकांकडे धाव घेतली असली तरी त्यांना ओटीपी मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा ओटीपी आधार बेस असून तो संबंधित संकेतस्थळावर आधार क्रमांक नोंदविल्यानंतर प्राप्त होतो.
तो नोंदविल्यानंतर संबंधितांची ई-केवायसी होते. मात्र या संकेतस्थळाहून लाभार्थ्यांना संकेतस्थळच प्रतिसाद देत नसल्याचे संदेश मिळू लागले आहेत. जिल्ह्यातील ५८ हजार ७१५ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांना केवळ प्रतिसाद मिळत नसल्याचे संदेश मिळू लागल्याने ते या लाभापासून वंचित राहतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.