Hingoli News : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती याजोखीम बाबीअंतर्गत शेतकऱ्यांनी ४ लाख ५४ हजार ७१ पूर्वसूचना (पीकविमा दावे) विमा कंपनीकडे दाखल केले आहेत. त्यानुसार नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी विमा कंपनीला दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४ लाख ७२ हजार १५ पीकविमा प्रस्ताव दाखल केले आहेत.
जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडलांमध्ये सोमवारी (ता.२) अतिवृष्टी झाल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमबाबीअंतर्गत शेतकऱ्यांनी ४ लाख ५४ हजार ७१ पूर्वसूचना (पीकविमा दावे) कंपनीकडे दाखल केल्याचे कंपनीने कळविले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेतील तरतुदीप्रमाणे जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, कापूस आदी सर्व पिकांमधील दाखल पूर्वसूचनांपैकी ३० टक्के पूर्वसूचनांचे नुमना सर्वेक्षण (सॅम्पल सर्व्हे) करून झालेल्या नुकसानीच्या व क्षेत्राच्या प्रमाणात मदत देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.
या सर्व्हेक्षणासाठी क्षेत्रीय स्तरावर संबंधित कृषी सहायक, विमा प्रतिनिधी व शेतकरी यांची उपसमिती नेमली असून त्यांच्या कामाचे संनियंत्रण संबंधित मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व तालुकास्तरीय विमा प्रतिनिधी यांनी करावेत, असे आदेशही जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.