कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात कांद्याच्या आवकेत मागील सप्ताहाच्या तुलनेत अडीच हजार क्विंटलने वाढ झाली. कांद्यास १००० ते ४२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गेल्या सप्ताहात कांद्याची एकूण आवक १४ हजार ७८३ क्विंटल होती. या सप्ताहात १७,२६७ क्विंटल झाली.
बटाट्याच्या आवकेतही २८०० क्विंटलने वाढ झाली. बटाट्यास सरासरी ७१५ रुपये क्विंटल असा दर मिळाला. गेल्या सप्ताहातील बटाट्याचा सरासरी दर ७८० रुपये इतका होता. लसणाच्या आवकेतही गेल्या सप्ताहाच्या तुलनेत एक हजार क्विंटलने वाढ झाली. लसणास सरासरी ३००० रुपये क्विंटल दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
भाजीपाल्यामध्ये वांगी, ओला वाटाण्याचे दर या सप्ताहातही तेजीत होते. वांग्याची दररोज एक हजार करंड्या आवक झाली. वांग्यास १४० ते ३७० रुपये प्रतिदहाकिलो असा दर होता. परतीच्या पावसामुळे बहुतांशी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली होती. यामध्ये वांग्याचे दरही लक्षणीय वाढले होते. हे दर अद्यापही बाजार समितीत कायम आहेत. सध्या ढगाळ हवामानामुळे वांग्याचे व्यवस्थापन करणे अशक्य होत आहे. यामुळे वांग्याची आवक अनियमित आहे. परिणामी वाढलेले दर कायम असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
बाजार समितीत टोमॅटोची दररोज दोन हजार कॅरेट आवक झाली. टोमॅटोस १०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत भेंडीच्या आवकेत सुधारणा झाली होती. भेंडीची दररोज तीनशे ते चारशे करंड्या आवक झाली. भेंडीस १०० ते ४५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दररोज पंचवीस ते तीस हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला.