नाशिक : नाशिक, नगर जिल्ह्यातून वाढलेली आवक, बांगलादेशातून होणारी स्थिर मागणी या स्थितीत गतसप्ताहात टोमॅटोचे दर ४५५ ते १६३५ रुपये, तर सरासरी १०५५ रुपये क्विंटल यादरम्यान स्थिर राहिले.
नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत दिवसाला ३५ हजार क्विंटल टोमॅटोची आवक झाली. नाशिक व नगर जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यात आवक वाढतीच होती. दरम्यान, येत्या सप्ताहात बांगलादेशात जाणारा माल मोहरमच्या सुटीमुळे बंद राहणार आहे. या काळात देशांतर्गत बाजारपेठेतून होणारी मागणी, तसेच दरही स्थिर राहतील, असे जाणकारांनी सांगितले.
मागील पंधरवड्यात राज्यातील टोमॅटो उत्पादक जिल्ह्यातून बांगलादेशात पाठविल्या जाणाऱ्या टोमॅटोत दुपटीने वाढ झाली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत आवक वाढली. या स्थितीत टोमॅटोला प्रति २० किलोला ५० ते ३५० रुपये, तर सरासरी १८० रुपये दर मिळाला. गतसप्ताहातही दराचे हेच चित्र बाजारात होते.
कर्नाटक व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खरीप व लेट खरीप टोमॅटोची लागवड होते. दरवर्षी कर्नाटक राज्यातील हंगाम आटोपल्यानंतर महाराष्ट्रातील हंगाम सुरू होतो. यंदा नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील हंगाम ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाला. दरम्यान, सप्टेंबर अर्धा होऊनही कर्नाटक राज्यातील हंगाम सुरू आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी बाजारातही टोमॅटोची आवक वाढली आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील नाशिक व नगर या टोमॅटोच्या आगारात टोमॅटोची आवक वाढलेली आहे.
नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ऑगस्ट महिन्यात सरासरी ६० हजार क्रेटची आवक होती. त्यादरम्यान १५ ऑगस्टनंतर चार दिवस प्रति २० किलोचे दर १०० ते १२०० रुपये, तर सरासरी ५५० रुपये होते. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यानंतर आवकेत वाढ होत गेली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात सरासरी २० किलो वजनाच्या सरासरी दीड लाख क्रेटची आवक झाली. या स्थितीत बांगलादेशमधील बाजारपेठेतून होणारी आवक स्थिर आहे. दरम्यान, दर प्रति २० किलोला ५० ते ३५० रुपये, तर सरासरी १८० पर्यंत स्थिर झाले आहे.
मागील सप्ताहात या आवकेत काहीशी घट झाली आहे. मोहरमच्या सुटीमुळे माल बांगलादेशात जाऊ शकणार नसल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. बाजाराच्या स्थितीचा अंदाज घेत शेतकऱ्यांनीही माल बाजारात कमी आणला होता. येत्या सप्ताहातही शेतकऱ्यांना हेच नियोजन करावे लागणार आहे.
शुक्रवारी (ता.२२) मोहरम होता. यामुळे शुक्रवार (ता. २२) ते शनिवार (ता. ३०) या दरम्यान बांगलादेशकडे जाणारा माल दरवर्षी बंद होतो. त्याचाही परिणाम बाजारावर झाला आहे.
बांगलादेशासाठी माल पाठविणाऱ्या बहुतांश मोठ्या व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. पाकिस्तान हा भारतीय टोमॅटोचा आयातदार देश आहे. मागील वर्षापासून सीमा बंद असल्याने टोमॅटो मालाचा निपटारा होऊ शकत नाही. या स्थितीत टोमॅटोचे मार्केट सप्टेंबरअखेरपर्यंत स्थिर राहील. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन माल बाजारात येईल. त्या काळात मागणी व दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले.