Sugar Season
Sugar Season Agrowon
ताज्या बातम्या

Sugar crushing season: महाराष्ट्रात दोन महिने आधीच साखर कारखान्यांची धुराडी थंडावणार

Team Agrowon

महाराष्ट्रात यंदा उसाचा गाळप (Sugarcane Crushing) हंगाम गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ ते ६० दिवस आधीच संपण्याची शक्यता आहे. यंदा जादा पावसामुळे ऊस उत्पादनात (Sugarcane Production) घट आहे.

त्यामुळे उसाची उपलब्धता कमी राहणार असल्याने यंदा कारखान्यांची धुराडी लवकर बंद होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिल्याची बातमी रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.

देशातील एकूण साखर उत्पादनात (Sugar Production) महाराष्ट्राचा वाटा जवळपास एक तृतियांश इतका मोठा आहे. गेल्या वर्षी एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या २०२२-२३ च्या गळीत हंगामात महाराष्ट्रात १२८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे, असे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

हंगामाच्या सुरूवातीला मात्र १३८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज हुकला आहे.

महाराष्ट्रात साखर उत्पादन कमी झाल्याने देशातील एकूण साखर उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे साखर निर्यातीसाठी अतिरिक्त कोटा जाहीर होण्याची शक्यता मावळली.

भारतातून साखर निर्यात घटणार असल्याने त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारावर उमटणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चढे राहतील. भारताचे स्पर्धक असलेले ब्राझील आणि थायलंडसारखे देश साखर निर्यात वाढवण्याची शक्यता आहे.

यंदा केंद्र सरकारने साखर कारखान्यांना केवळ ६१ लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिली. त्यापैकी सुमारे ५७ लाख टन साखर निर्यातीचे करार पूर्ण झालेले आहेत.

‘‘यंदा जादा पाऊस झाल्यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला. यंदाच्या हंगामात गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध झाला, '' साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.

मध्य महाराष्ट्रातील काही साखर कारखाने १५ दिवसांत गाळप गुंडाळायला सुरूवात करतील आणि एप्रिल अखेरीसपर्यंत तीन-चार कारखाने वगळता इतर सर्व कारखान्यांचे गाळप थांबलेले असेल, असे त्यांनी सांगितले.

गेल्या हंगामात (२०२१-२२) मात्र राज्यात जूनच्या मध्यापर्यंत कारखान्यांचे गाळप सुरू होते. कारण त्यावेळी अतिरिक्त उसाची समस्या भेडसावत होती.

महाराष्ट्रात नेहमीच साखर उत्पादनात टोकाचे चढ-उतार होत असतात आणि त्यामुळे आंतरराष्‍ट्रीय बाजाराला आश्चर्याचे धक्के बसत असतात.

यंदाच्या हंगामात राज्यात आतापर्यंत ६७.६ लाख टन साखर उत्पादन झालेले आहे. गेल्या वर्षी ६६.७ लाख टन उत्पादन झाले होते.

निर्यात मंदावली

गेल्या हंगामात राज्यात विक्रमी १३७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. सुरूवातीला ११२ लाख टन उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

हा अंदाज चुकवून राज्यात विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे देशाच्या एकूण साखर उत्पादनात भरीव वाढ झाली. त्यामुळे केंद्र सरकारला विक्रमी ११२ लाख टन साखर निर्यातीला परवानगी देणे शक्य झाले.

परंतु यंदा मात्र महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकात ऊस उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा घटले. त्यामुळे केंद्र सरकार साखर निर्यातीसाठी अतिरिक्त कोटा जाहीर करण्याची आता शक्यता उरलेली नाही, असे एका आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेशी संबंधित डिलरने सांगितले.

महाराष्ट्रात ऊस उत्पादन वाढेल, या भरवशावर साखर उद्योगाकडून अतिरिक्त साखर निर्यातीसाठी लॉबिंग सुरू होते. परंतु महाराष्ट्रातच उत्पादन घटलेले असल्याने त्यावर पाणी पडले आहे, असे या डिलरने सांगितले.

भारतातून प्रामुख्याने बांगलादेश, मलेशिया, सुदान, सोमालिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना साखर निर्यात केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT