Electricity
Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Electricity : देखभाल, दुरुस्तीअभावी वीज पुरवठा बनला धोकादायक

Team Agrowon

परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा (Power supply ) करणाऱ्या प्रणालीची देखभाल दुरुस्ती महावितरणकडून नियमितपणे केली जात नाही. परिणामी योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी रोहित्रावरील फ्युज बॉक्सची दुरवस्था झाली आहे. जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा तुटून दुर्घटना घडत आहेत. अनेक ठिकाणचे खांब कमकुवत झाले आहेत. गाव शिवारातील धोकादायक बनलेली वीज वितरण प्रणाली शेतकरी, पशुधनासाठी धोकादायक ठरत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील अनेक भागांत महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रातून कृषी पंपाना वीजपुरवठा करणाऱ्या उच्च दाब वीज वाहक प्रणाली तसेच रोहित्रावरून शेतकऱ्यांच्या सिंचन स्रोतांवरील पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या प्रणालीची गेल्या कित्येक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे जीर्ण वीज वाहक तारा तुटून अपघात होत आहेत.

शुक्रवारी (ता. १६) सकाळी कोक (ता. जिंतूर) येथील शेतात हळद पीकास पाणी देत असताना तुटून पडलेल्या वीज वाहक तारेला स्पर्श झाल्यामुळे अशोक सोमनाथ काळे या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तुटलेल्या वीज वाहक तारांना स्पर्श होऊन अनेक ठिकाणी गाई, बैल, म्हशी आदी पशुधन दगावल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक भागांतील शिवारात तसेच गावांत विजेचे खांब झुकले आहेत. ताण सैल पडल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. तुटलेल्या तारांना जोड देण्यात आलेले आहेत. वादळी वाऱ्यात तारा हेलकावे खातात.

त्यामुळे शेतीकामे करण्यासह रस्त्यावरून ये-जा करणे, शेतीमालाची वाहतूक करणे जोखमीचे झाले आहे. महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यानंतर कृषी पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या प्रणालीची दुरुस्ती नियमतपणे करावी. त्यासाठी महावितरणला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रोहित्राची दुरवस्था... अनेक ठिकाणी रोहित्रावरील फ्यूज बॉक्स चांगल्या स्थितीत सापडणे दुर्मिळ बाब बनली आहे. कृषी पंप रोहित्रावरील फ्यूज बॉक्स गंजले आहेत. फ्यूजची तुटफुट झालेली आहे. त्यामुळे योग्य दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे कृषी पंप बिघडण्याचे प्रमाण वाढत आहेत. रोहित्राची देखभाल दुरुस्ती शेतकऱ्यांना स्वखर्चाने करावी लागत आहे. कृषी पंप वीजपुरवठा प्रणालीची दरवर्षी देखभाल दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे योग्य दाबाने वीज मिळत नाही. अनेक प्रसंगी शेतकरी, पशुधनाच्या जीवावर बेतत आहे. यास सर्वस्वी महावितरण जबाबदार आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. - राजाभाऊ गोरे, शेतकरी संघटना, बोरी, ता. जिंतूर आमच्या गाव तसेच शिवारातील वीज वाहक तारा जीर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणचे खांब तुटले आहेत. महावितरणकडे दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांना जोखीम पत्करून शेती कामे करावी लागत आहेत. - माणिकराव सूर्यवंशी, सिंगणापूर, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT