Himanta Biswa Sarma &Uddhav Thackeray
Himanta Biswa Sarma &Uddhav Thackeray Agrowon
ताज्या बातम्या

उध्दव ठाकरेंना आसाम भेटीचे आमंत्रण

Team Agrowon

``आसाममध्ये सर्वच आमदारांचं स्वागत आहे. आमदारांच्या आसाम वारीमुळे हॉटेल उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे राज्याचं उत्पन्न वाढलंय. पर्यटन उद्योगाला वाव मिळतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही सुट्टी घालवायला आसाममध्ये यावं,`` अशा शब्दांत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sharma) यांनी ठाकरेंना आसाम भेटीचं आमंत्रण दिलंय.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर ते समर्थक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपशासित आसाम हे राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. भाजपची या बंडाला फुस असल्याचे आरोप होत आहेत.

आसाममध्ये आलेल्या बंडखोर आमदारांना राज्य सरकार सर्व प्रकारचं सहकार्य व सुरक्षा पुरवत असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजुला आसाममध्ये पावसाने दाणादाण उडाली आहे. तिथे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून अतिवृष्टीने अनेक बळी घेतले आहेत. पावसाच्या संकटात सापडलेल्या आसामच्या (Aasam Flood) जनतेला दिलासा देण्याऐवजी आसाम सरकार महाराष्ट्रातील सरकार उलथून लावण्याचा कट मार्गी लागण्यात गुंतले असल्याची टीका आसाममधील विरोधी पक्षांकडून होत आहे.

मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sharma) यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सरमा यांनी आसाममधील पर्यटन उद्योगाच्या भरभराटीची ढाल पुढे केली आहे. दरम्यान, मुंबईत मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आक्रमक होऊन पक्षांतर्गत बंडखोरांवर हल्ला चढवला आहे. ``तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचे पाप झाले. बाळासाहेबांचा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा,`` अशा शब्दांत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. ठाकरे यांनी आज शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला.

तिकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही. एकनाथ शिंदेंसाठी (Eknath Shinde) काय नाही केले ? माझ्याकडची दोन खाती मी शिंदेंना दिली. शिंदेंसाठी मी काय कमी केले ?, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात. आधी बाळासाहेबांना विठ्ठल आणि मला बडवे म्हणले जायचे. आता आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वतःचा पोरगा खासदार करायचा, अशा शब्दांत त्यांनी शिंदेवर निशाणा साधला.

बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केले? असा सवाल करत ठाकरे यांनी, संजय राठोडांवर अनेक आरोप झाले. विचित्र आरोप झाले. त्या काळातही मी त्यांना सांभाळून घेतल्याचे सांगितले.
भाजपसोबत जायला पाहिजे म्हणून काहींचा दबाव आहे पण मी शांत आहे, षंढ नाही. हे सारे भाजपने केले, त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल. माझे मुख्यमंत्रिपद नाकारणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, झाड न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही, असे ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांचे माझ्याहूनही लाडके अपत्य म्हणजे शिवसेना.

ज्या शिवसेनेसाठी जीवही देईल असे जे म्हणायचे, तेच आज पळून गेले आहेत. जे निघून गेले. त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही.आपल्या माथी अनेकदा पराभव आला आहे. पण फरक कोणता पडला नाही. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला तशी आता परिस्थिती आहे अस समजा. कोण कसे वागले हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यापूर्वीही लोकांनी सेनेशी गद्दारी केली. शिवसेनेची मुळे माझ्यासोबत आहेत, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

दरम्यान एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त आहे. शिंदे गटाच्या आमदारांची आज सायंकाळी बैठक होणार आहे. त्याआधी शिंदे दिल्लीला रवाना झाले. ते कशासाठी रवाना झाले आहेत आणि कुणाला भेटणार आहेत याची माहिती समोर आली नाही. दरम्यान महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेनेने शिंदे गटातल्या आणखी ४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे केली आहे. त्यापूर्वी शिवसेनेने शिंदे गटातल्या १२ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. शिंदे गटाकडून दोन दिवसांपूर्वीच झिरवळ यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव यापूर्वीच दाखल केला असल्याने त्यांना आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे पत्र आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी दिले.

दरम्यान, शिंदे गटाकडून आपणच मूळ पक्ष असल्याचे सिद्ध करण्यासाठी धडपड सुरु आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नाव मिळणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले. दरम्यान, शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्या साखर कारखान्याची जमीन जप्त करण्यात आली आहे. परंतु या कारवाईबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT