Grampanchyat Election Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchyat Election : व्हायचंय सरपंच तर कर खर्च!

उमेदवार गावकारभारासाठी नशीब आजमावणार; राजकीय चर्चांनी वातावरण गरम

Team Agrowon

साक्री, जि. धुळे ः गावकारभारी निवडण्यासाठी दाखल होणारे अर्ज, माघारीची प्रक्रिया आता पार पडली आहे. सरपंच होण्याची इच्छा मनाशी बाळगून असलेल्या अनेक इच्छुकांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ऐन हिवाळ्यात राजकीय चर्चांनी गावागावांत अन् चौकाचौकांत वातावरण गरम होत आहे. ‘मीच सरपंच होणार!’ नव्हे, तर ‘मतदार कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार?’ याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे ‘व्हायचे सरपंच तर कर खर्च!’ अशी गत इच्छुक उमेदवारांची होतेय.

तालुक्यातील अनेक लहान-मोठ्या ग्रामपंचायतींचे कारभारी निवडून देण्यासाठी निवडणूक पार पडणार आहे. तसेच जनतेच्या मनातील व्यक्ती थेट सरपंचपदावर विराजमान होणार असल्यामुळे राजकीय रंगत वाढू लागली आहे. अनेक गावांत तर मतदारांचा कौल स्पष्ट होत नसल्याने निवडणुकीत चुरस वाढण्यासोबतच इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढविणारी ठरते आहे.

छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर सुमारे दहा दिवसांचा कालावधी उमेदवारांना प्रचारासाठी अन् मतदारांना विचार करण्यासाठी मिळाला आहे. मात्र हा कालावधी उमेदवारांवर वातावरण टिकविण्याचा ‘दबाव’, तर मतदारांना मिरवून घेण्यासाठी ‘रुबाब’ वाढविणारा ठरणार आहे. अनेक गावांमध्ये रिंगणातील उमेदवार मागील काळात केलेली विकासकामे सांगून मते मागत आहेत, तर काहींनी परिवर्तन होणे आवश्यक असल्याचे सांगत मतदारांना साद घालणे पसंत केले आहे. काही गावांतील नवख्या इच्छुकांनी मात्र परंपरागत सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही नको म्हणत नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी, असा सूर घेतला आहे. या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यात मतदारांचे पक्के मनोरंजन होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. यातही दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक म्हणजे काही दिवस होणारी ‘दिवाळी’ समजून ‘जेवणावळी’चा मिळेल तेथून आस्वाद घेणाऱ्यांची ही संख्या गावागावांत असल्याने, त्यांचे चोचले पुरविणे उमेदवारांना ऐन थंडीत ‘घाम’ फोडणारे ठरते आहे.

गावविकासाशी काहीही देणंघेणं नसलेल्या अशा मतदारांच्या पोटाची तृप्ती ही मतदान यंत्रावर ठेवल्या जाणाऱ्या बोटातून दिसणार असल्यामुळे अशा लहरी मतदारांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागते आहे. असे असले तरी सदसद्‌विवेकबुद्धीचा वापर करून पाच वर्षांसारख्या दीर्घकाळासाठी निवडून दिले जाणारे गावकारभारी गावविकासाचा संकल्प हाती घेत, ग्रामस्थांचा सहभाग नोंदवत, गावाचा सर्वांगीण-समतोल विकासासाठी झटणारा असावा. वारसा नसला तरी जनसेवेचा आरसा असणारा हवा. अशी अपेक्षाही यानिमित्ताने समोर येतोय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT