Karnataka Hapus : कर्नाटकी आंबा ‘हापूस’ म्हणून विकणाऱ्यांना समज

Hapus Mango : बागायतदार आक्रमक; हापूसची पत सुधारण्यासाठी निर्णय
Mango
MangoAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Ratnagiri Market News :
यंदा ‘हापूस’चे उत्पादन घटल्याने जिल्ह्यातील काही बागायतदार कर्नाटकी आंबा ‘हापूस’ (Alphanso) च्या नावाने विकत आहेत. त्यांच्याविरोधात स्थानिक बागायतदार आक्रमक झाले आहेत. बुधवारपासून (ता. १७) त्या शेतकऱ्यांना भेटून समज देण्यात येणार आहे.

कर्नाटकी आंब्याची विक्री हापूसच्या मुळावर आल्यामुळे हापूसची घसरणारी पत सुधारण्यासाठी हा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आल्याचे बागायतदारांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला पावस परिसर आंबा उत्पादक संघ अध्यक्ष बावा साळवी, जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, इशांत सावंत, तुकाराम घवाळी, प्रसन्न पेठे, दीपक राऊत यांच्यासह उपस्थित बागायतदारांनी माहिती दिली.

हापूस कमी असल्यामुळे काही बागायतदारांनी कर्नाटकी आंबा मुंबई, पुण्यासह स्थानिक पातळीवर विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे हापूस खाणाऱ्या ग्राहकांकडून तक्रारी येत आहेत. हापूसचे महत्त्व कमी झाले असून, हापूसला चव नाही अशी अनेकांची मत आहेत. हापूस बदनाम होत असून, वेळीच त्यावर रोख लावावा लागणार आहे.

Mango
कर्नाटकी आंबा म्हणून रत्नागिरी हापूस जप्त

कर्नाटकी आंबा विकणाऱ्यांना सुरुवातीला भेटून समजावण्यात येईल. त्यानंतरही ते ऐकले नाहीत तर कडक भूमिका घेतली जाईल. कॅनिंगच्या चार ते पाच गाड्या दररोज कर्नाटकमधून आंबा घेऊन येत आहेत.

यावर कृषी विभाग, जिल्हा प्रशासनासह पोलिस आणि अन्य खात्यांकडून कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे १०० किलोने विकला जाणारा हापूसचा दर ४० ते ५० रुपये किलो इतका कमी झाला आहे.

या बाबी २५ मे रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या जाणार आहेत, असे बावा साळवी, इशांत सावंत यांच्यासह अन्य बागायतदारांनी सांगितले.

Mango
Hapus Mango Season : हापूस आंब्याच्या सुवासाचे वैशिष्ट

बागायतदारांच्या प्रश्‍नांबाबत रस्त्यावर उतरावे लागले तरीही त्याची तयारी केल्याचा इशारा बागायतदारांनी दिला आहे. शासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर भविष्यात आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही या वेळी सांगितले

. श्री. साळवी म्हणाले, गेली सात वर्षे बागायतदार अडचणीत आहेत. यंदा बँकेचे हप्ते, कीटकनाशकांचा खर्च आणि कामगारांचा पगार देता येणार नाही,

अशी परिस्थिती आली आहे. उन्हाचा कडाका, थ्रीप्स, तुडतुडा आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन दहा ते बारा टक्केच आले आहे. या बाबत सरकारचे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

सध्याच्या परिस्थितीचा सर्व्हे कृषी विभागाकडून तत्काळ होणे आवश्यक आहे. कोकण कृषी विद्यापीठाने अहवाल दिलेला असतानाही त्यावर कार्यवाही झालेली नाही.

या बाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन कृषिमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपेक्षा आहेत. शेतकऱ्यांना बँका नवीन कर्ज देत नाहीत.

त्यामुळे शासनाने यंदाची स्थिती लक्षात घेऊन भविष्यात बागायतदार उभा राहावा अशी तरतूद करावी यासाठी विशेष पॅकेज मिळावे, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

कीटकनाशकांवर वारेमाप खर्च
कोकण कृषी विद्यापीठाकडून थ्रीप्ससारख्या हापूसवरील रोगाला पूरक अशी कीटकनाशके दिली जात नाहीत. यावर विशेष संशोधन होणे गरजेचे आहे.

सध्या अनेक कंपन्या बागायतदारांना कीटकनाशके पुरवतात. त्यावर वारेमाप खर्च होतो. प्रत्यक्षात त्याचा उपयोग होत नाही.

यासाठी भविष्यात जिल्हा आंबा उत्पादक संघाच्या परवानगीने कीटकनाशकांची विक्री कशी करता येईल याचा विचार केला जाणार असल्याचे प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, इशांत सावंत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com