
हवामान अंदाजानूसार दिनांक १३ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक १४ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर,जालना,बीड व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० कि.मी. असणार आहे.
तसेच मराठवाडयात दि.१४ मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बाष्पोत्सर्जनाचा वेग आणि जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक १५ ते २१ मार्च दरम्यान कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.
काढणी केलेल्या हरभरा, करडई, गहू, रब्बी ज्वारी पिकाची मळणी लवकरात लवकर करून घ्यावी.मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
तूरळक ठिकाणी झालेल्या पावसामूळे काढणी केलेले पिक भिजले असल्यास वाळल्यानंतर मळणी करावी. काढणी किंवा मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.
सध्या हळदीची काढणी,हळद उकडणे,वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. त्यामुळे हळदीची उघडयावर साठवण करू नये.
काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची, द्राक्ष फळांची,काढणी करून घ्यावी. फळधारणा सुरू असलेल्या अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावं.
वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावं.
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी द्राक्ष बागेत आच्छादन करावं.
आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावं. सध्या आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून येत आहे. व्यवस्थापनासाठी बागेत एनएए १५ पीपीएम ची फवारणी करावी.
काढणी केलेला ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.