
नीरज हातेकर
Language communication Story : भाषा हे प्रामुख्याने संवाद साधायचे साधन आहे. ज्यांना पोटापाण्यासाठी संवाद साधणे ही प्राथमिकता असते ते अमक्याशी या भाषेत बोलणार नाहीत वगैर न परवडणाऱ्या अस्मितेच्या भानगडीत पडत नाहीत.
जुनी व्यापारी केंद्रे बहुभाषिक होती. तेथे अनेक भाषा बोलल्या जात. त्यातून भाषा मिसळल्या, बदलल्या. बंगळूरमध्येही हल्ली टॅक्सी, रिक्षावाले, दुकानदार वगैरे हिंदी बोलतात.
बंगळूरमध्ये विरोध हिंदीला नाही, तर जबरदस्तीने हिंदी थोपण्याला आहे. आणि ते बरोबरच आहे. उदा. इथे नंदिनी दूध, दही वगैरे मिळते. नंदिनीच्या दह्याच्या पाकिटावर दही असा स्पष्ट उल्लेख करण्याचा आदेश ‘एफएसएसआय’ने काढला आहे.
वास्तविक दह्याला कर्नाटकात मोजुरू म्हणतात. दही हा शब्द स्थानिक नाही. म्हणून हा शब्द आणि हिंदी भाषा थोपली जाते आहे, असं लोकांना वाटतंय. म्हणून विरोध सुरू आहे.
मी बंगळुरात मुद्दाम कानडीत बोलायचा प्रयत्न करतो; पण बऱ्याच वेळेला माझे कानडी इतके भयानक असते, की लोक आपणच हिंदीत बोलायला सुरुवात करतात.
मोठ्या मोठ्या रेशमी साड्यांच्या वगैरे दुकानात तर हिंदी किंवा इंग्रजीत संवाद साधतात. धंदा करायचा असतो, आणि धंदा करण्यासाठी संवाद ही पूर्वअट असते.
भाषा हे संवादाचे माध्यम. संवादाबरोबरच भाषासुद्धा उत्क्रांत होते. म्हणून उगाच कोणत्याही विशिष्ट भाषेचा फार आग्रह धरू नये.
महाराष्ट्रातच मराठी न बोलता येणारे समाज आहेत. गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात मला संवाद साधायचा असेल, तर हिंदीत बोलावे लागते अजूनही. एखाद्या भाषेविषयी तुच्छतेची भावना बाळगणे वाईट, तसेच ती भाषा न येणाऱ्या लोकांशी तेवढ्या एकाच कारणाने संवाद टाळणेसुद्धा चुकीचे.
मराठीचा अभिमान असेल तर मराठीत लिहावे, बोलावे. नवीन ज्ञान निर्मिती मराठीत करावी. महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, तर मराठी आलेच पाहिजे. म्हणून महाराष्ट्रात नोकरी करणाऱ्या सामाजिक शास्त्राच्या प्राध्यापकांना तरी मराठी उत्तम लिहिता, वाचता, बोलता, आलेच पाहिजे असे मला ठामपणे वाटते.
किमान बौद्धिक प्रामाणिकपणा म्हणून आलेच पाहिजे. पण याचा अर्थ असा नव्हे की मराठी न येणाऱ्याना, मुंबईसारख्या जगभरची सरमिसळ असलेल्या शहरात जमेल त्या जोड भाषेत संवाद साधणाऱ्या लोकांना उगाच मराठी बोलत नाहीत म्हणून त्रास द्यायचा, दगड मारायचे.
शिवाय मराठी म्हणजे हीच हे कोण ठरवणार? इथले आदिवासी, भटके बोलतात त्या महाराष्ट्रातीलच भाषा आहेत. त्यांच्या भाषेत इतर अनेक प्रांतातील, उत्तर आणि दक्षिण, दोन्हींकडील भाषांची खिचडी असते. त्याचं काय? त्यांना सुद्धा जबरदस्तीने ‘मराठीच’ बोलायला लावणार का?
माझी एक विद्यार्थिनी आहे. दार्जिलिंगमध्ये एका खेड्यात तिचं कुटुंब चहाच्या मळ्यावर कामगार आहे. मुलगी आदिवासी कुटुंबातली. ती बंगाली, नेपाळी, ओराव, कुदुक या आदिवासी भाषा बोलते. हिंदीसुद्धा बोलते.
इंग्रजीही संवाद साधण्यापुरते बोलते. शिवाय मला नावही माहीत नसलेली कोणती तरी आदिवासी भाषा बोलते. ती चहाला चाय म्हणते. तेवढ्यावरून मी तिच्याशी बोलायचं टाळायचं की तिच्याकडून जमेल तितक्या भाषा शिकून घ्यायचा प्रयत्न करायचा?
(लेखक प्रख्यात अर्थतज्ज्ञ असून अझीम प्रेमजी विद्यापीठात अध्यापन करतात.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.