Moisture Conservation : ओलावा टिकविण्यासाठी कोळपणी महत्त्वाची...

Dryland Farming : कोळपणीमुळे माती हलवून मोकळी झाल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो.त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारी करिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.
Moisture Conservation
Moisture Conservation
Published on
Updated on

डॉ.आदिनाथ ताकटे
Rabi Season : कोळपणीमुळे माती हलवून मोकळी झाल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो.त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारी करिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.


जमिनीत साठवून राहिलेली ओल पिकांनी वापरणे, पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाणे,भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवन होणे,तणावाटे ओल नष्ट होणे या चार मार्गाने ओल कमी होते.त्यातील पिकाच्या प्रत्यक्ष वाढीसाठी अतिशय कमी प्रमाणात ओल लागते.बहुतांशी (सुमारे ६० टक्के) ओल ही बाष्पीभवनामुळे उडून जाते. यासाठी पिकामध्ये कोळपणी करणे फायद्याचे ठरते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१) पीक वाढताना त्याबरोबर तण वाढत असते. हे तण पाणी अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करते.पीक उगवून आल्यावर त्यात ठराविक दिवसानंतर कोळपणी केली जाते.त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थांबविणे.

तणामुळे कमी होणारी ओल, तणांचा बंदोबस्त केल्याने राखली जाते.याशिवाय माती हलवून मोकळी केल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो.त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. यामुळे ओल टिकवून धरण्यामध्ये कोळपणीचा फार मोठा वाटा आहे.

२) एकदा कोळपणी केली तर पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. या तत्त्वांचा अवलंब करून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारी करिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.पहिली कोळपणी पीक तीन आठवड्याचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी.

त्यामुळे वाढणारे तण नष्ट करून त्यावाटे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो. दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी. त्यावेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात, त्या कोळपणीमुळे बंद होतात.

त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते. तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्याचे झाले असताना करावी. त्यावेळी कोळपणी करण्यासाठी दातेरी कोळपे वापरण्याची शिफारस आहे.

३) जमीन टणक झाल्याने फासाचे कोळपे नीट चालत नाही.त्याकरिता दातेरी कोळपे वापरले असता ते मातीत व्यवस्थित घुसून माती मोकळी करते, त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. ज्यावेळी जमिनीत ओल फार कमी असेल त्यावेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.

Moisture Conservation
Soil Moisture : आंतरमशागतीतून टिकवा जमिनीतील ओलावा

ज्वारीमधील कोळपणी ः
पहिली कोळपणी---तिसऱ्या आठवड्यात---फटीचे कोळपे
दुसरी कोळपणी---पाचव्या आठवड्यात---पासेचे कोळपे
तिसरी कोळपणी---आठव्या आठवड्यात---दातेरी कोळपे

४) कोरडवाहू रब्बी ज्वारी तयार होण्यास साधारणपणे १८० पासून २८० मिमी ओल लागते. त्यापैकी ४० टक्के ओल पीक फुलोऱ्यात येण्यापासून तयार होण्याच्या अवस्थेत लागते म्हणून प्रयत्न पूर्वक ओल साठविण्याचे उपाय करावे.

५) आंतरमशागतीकरिता खुरपणी देखील अपेक्षित आहे.परंतु सुरवातीस ज्यावेळी जमीन मऊ आहे आणि तण वाढत आहे,त्यावेळी या खुरपणीचा लाभ होतो. परंतु बैल कोळपे चालविल्याने खोलवर मशागत करता येते. जमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. मर्यादेपेक्षा जादा असलेली रोपे काढून टाकणे हा पण एक ओलावा टिकविण्याचा उपाय आहे.

पाणी व्यवस्थापन:
१) ज्वारी हे कोरडवाहू पीक म्हणून ओळखले जाते. या पिकास तयार होण्यासाठी ११० ते १२० दिवस लागत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते.

२) बागायती ज्वारीस दिलेल्या पाण्यापैकी ७० टक्के पाणी पहिल्या ३० सेंमी जमिनीच्या थरातून,१६ टक्के पाणी दुसऱ्या थरातून,९ टक्के पाणी तिसऱ्या थरातून तर उरलेले ५ टक्के पाणी चौथ्या थरातून पीक घेत असते. पहिल्या ३० सेंमी थरात ६० टक्यांपेक्षा जास्त मुळे असल्याने या थरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भागवली जाते.

३) बागायती ज्वारीस पीक वाढीच्या महत्त्वाच्या चार अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते.मात्र भारी,काळ्या खोल जमिनीत पहिल्या तीन अवस्थेतच पाणी द्यावे.

रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था
ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ : पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी
पीक पोटरीत असताना : पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी
पीक फुलोऱ्यात असताना : पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी
कणसात दाणे भरण्याचा काळ : पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी

१) कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना ५० ते ५५ दिवसांनी द्यावे.
२) दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.
३) बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना ९० ते ९५ दिवसांनी द्यावे.
४) भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.

संपर्क ः डॉ.आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती पद्धती,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com