Grape Management : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

Grape Crop : गेल्या आठवड्याचा द्राक्ष विभागातील आढावा घेताना काही भागांमध्ये उदा. नाशिक चांगला पाऊस झाल्याचे समजते, तर काही भागांत अपेक्षेइतका पाऊस झालेला दिसत नाही.
Grape Farm
Grape FarmAgrowon
Published on
Updated on

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय

Grape Advisory : गेल्या आठवड्याचा द्राक्ष विभागातील आढावा घेताना काही भागांमध्ये उदा. नाशिक चांगला पाऊस झाल्याचे समजते, तर काही भागांत अपेक्षेइतका पाऊस झालेला दिसत नाही. पाऊस झालेल्या व फळछाटणीचा कालावधी जवळ आलेल्या बागेत थोड्या फार समस्या येण्याची शक्यता आहे.

नवीन द्राक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने खुंट रोपांवर कलम करण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. या सोबत लवकर छाटणी झालेल्या बागेत या वेळी घडाचा विकास होत असताना दिसून येईल. अशा वेगवेगळ्या अवस्थेतील बागेत पुढील प्रमाणे कामांचे नियोजन करता येईल.

१) नवीन बागेत कलम करण्याची अवस्था ः
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा बऱ्यापैकी तयार झालेला असेल. त्याचा परिणाम आर्द्रता वाढण्यामध्ये होईल. ज्या भागात मागील आठवड्यात पाऊस चांगला झाला, अशा बागेत ८० टक्क्यांपुढे आर्द्रता वाढलेली असेल. आता पाऊस गेल्यामुळे मात्र ऊन वाढलेले असेल. परिणामी, तापमानात वाढ झालेली असेल.

ही स्थिती कलम करण्यासाठी पोषक आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे खुंट काडीमध्ये रस निर्माण झाला असेल. त्यामुळे कलम केल्यानंतरचा जोड मजबूत होण्यासाठी कॅलस तयार होण्याची आवश्यकता असते. सध्याचे वातावरण त्यासाठी पोषक आहे. म्हणून या वेळी बागेत शक्य तितक्या लवकर कलम करून घ्यावे.

Grape Farm
Grape Management : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

ज्या बागेत पाऊस येण्यापूर्वी कलम झालेले असेल, अशा ठिकाणी या वेळी रसरशीत काडी तयार झाल्यामुळे खुंट काडीवर फुटीची (सकर्स) वाढ जोमात होताना दिसेल. सध्याचे पोषक वातावरण कारणीभूत असेल. कलम केल्यानंतर साधारणतः सोळा ते सतरा दिवसांपासून डोळे फुटण्यास सुरुवात होते. हे डोळे फुटण्यासाठी सायन काडीमध्ये अन्नद्रव्यांचा भरपूर साठा आणि व्यवस्थित परिपक्व झालेली काडी (पीथ तपकिरी असणे.) या गोष्टी महत्त्वाच्या असतील. फक्त दोन पेऱ्यांची सायन काडी आपण कलम करण्यासाठी वापरत असतो.

ही काडी लहान असल्यामुळे नवीन फूट निघून दोन ते तीन पाने होईपर्यंत हा पुरवठा वापरला जातो. त्यानंतर मात्र खुंटकाडीमधून मुळाद्वारे अन्नद्रव्ये वरपर्यंत उपलब्ध झाले तरच फुटीची पुढील वाढ व्यवस्थित होते. यालाच आपण कलम यशस्वी झाले असे म्हणू शकतो. ही परिस्थिती तयार होण्यासाठी खुंट काडी एकतर अर्ध परिपक्व किंवा थोडीफार कोवळी वापरली जाते. खुंट काडी रसरशीत होण्यासाठी आपण कलम करण्यापूर्वी तीन ते चार दिवस आधी भरपूर पाणी देण्याची शिफारस करतो. ज्या ठिकाणी हा पाऊस झालेला नसेल, तिथे काडीमध्ये अपेक्षेइतका रस निर्माण झालेला नसावा. तेव्हा अशा बागेमध्ये कलम करण्यापूर्वी चार दिवस आधी भरपूर पाणी देऊन घ्यावे. त्याचा फायदा पुढील काळात कलम यशस्वी होण्यासाठी होईल.

Grape Farm
Grape Crop Management : कोरड्या वातावरणातील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

बऱ्याच बागेत कलम केल्यानंतर खुंटावर निघत असलेल्या फुटी काढण्याकडे दुर्लक्ष होते. जमिनीतील ओलावा आणि वाढलेली आर्द्रता यामुळे नवीन फुटी जोमात वाढताना दिसून येतील. या फुटीचा थेट परिणाम डोळे फुटण्यावर होतो. जर या फुटींच्या वाढण्याचा वेग जास्त असल्यास सायन काडीवर डोळा फुटण्यास उशीर होईल. काही परिस्थितीत डोळा फुटणारही नाही. तेव्हा फुटी काढण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे असेल.

२) काडीची परिपक्वता ः
या वर्षी बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी अधिक प्रमाणात झालेला दिसून येत आहे. काही ठिकाणी गरजेइतकाही पाऊस झाला नसल्याचे बोलले जाते. पाऊस कमी झाला असला तरी ढगाळ वातावरण जास्त काळ टिकल्यामुळे काडीच्या परिपक्वतेवर याचे विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. फळछाटणीकरिता काडी परिपक्व असणे ही सर्वांत महत्त्वाची गरज आहे. परिपक्व काडी ही बाहेरून तपकिरी रंगाची असेल व तिचा काप घेतल्यास आतमधील पीथ तपकिरी रंगाचे झालेले दिसेल. फळछाटणीकरिता पूर्ण परिपक्व काडीची आवश्यकता म्हणजे साधारणतः सबकेनच्या पुढे सात ते आठ डोळ्यांपर्यंत एकसारखा खाकी रंग असावा आणि आतमधील पीथसुद्धा तपकिरी रंगाचेच असावे. काडीच्या बाहेरील रंग व काप केल्यानंतर दिसणारा पीथचा रंग एकसारखा तपकिरी असल्यास काडी पूर्ण परिपक्व आहे, असे समजता येईल.

काही परिस्थितीत काडी बाहेरून पूर्ण तपकिरी झालेली असली तरी पीथ मात्र पांढरा दिसतो. या काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा पुरेसा नसल्यामुळे फळछाटणीनंतरच्या काळात एकतर घड जिरण्याची समस्या येते किंवा गोळीघड तयार होतो. अशा ठिकाणी मात्र पुढील उपाययोजना करता येतील.
- पाऊस नसला तरी बागेत पाणी फक्त खत देण्यापुरतेच सुरू ठेवावे. (१५ ते २० मिनिटे ठिबक चालवून खते देऊन घ्यावीत.)
- ढगाळ वातावरणामुळे बागेत आर्द्रता टिकून राहील. त्यामुळे वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण वाढेल. परिणामी, शेंडा व बगलफुटी वेगाने वाढताना दिसतील. अशा स्थितीत शेंडा पिंचिंग करणे, बगलफुटी काढणे व फुटी मोकळ्या करून तारेवर बांधून घेण्याची कामे करावीत.
- पालाशची उपलब्धता जमिनीतून (०-०-५०) एक ते सव्वा किलो प्रति एकर या प्रमाणे चार ते पाच वेळा ठिबकद्वारे द्यावे. तसेच ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तीन दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या करता येतील.

या पूर्वी पाण्याचा ताण बसलेल्या बागेत मात्र काडीची परिपक्वता कमी अधिक प्रमाणात दिसून येईल. काही ठिकाणी सबकेनच्या एक ते दोन डोळा मागे काडीची परिपक्वता अचानक थांबलेली दिसून येते. दुसऱ्या स्थितीमध्ये सुरुवातीचे काही पेरे परिपक्व झालेले असून, एखादा पेरा हिरवा राहून पुन्हा पुढील पेरा पुन्हा परिपक्व झालेला दिसून येतो. याला अनियमित काडीची परिपक्वता म्हणता येईल. ही परिस्थिती बऱ्याच वेळी बोट्रीडिप्लोडियामुळे असल्याचे बोलले जाते. यावर प्रभावी उपाययोजना म्हणजे पाण्याचा व खतांचा वेलीला ताण बसणार नाही, याकडे लक्ष देणे. बोट्रीडिप्लोडिया नियंत्रणात ठेवण्यासाठी, कॉपरयुक्त बुरशीनाशकांची (बोर्डो एक टक्का, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे वेलीवर फवारणी करावी किंवा ट्राय अझोल गटातील बुरशीनाशकांचे दीड ते दोन मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रति झाड एक लिटर द्रावणाचे ड्रेचिंग करून घ्यावे.

पालाशची उपलब्धता न होणे हेच काडीची परिपक्वता न होण्याची महत्त्वाचे कारण असू शकते. वेलीला ताण बसल्यामुळे जमिनीतून दिलेले पालाशही वेलीकडून उचलले गेलेले नसेल. ताणाच्या स्थितीमध्ये काही वेळा मुळे अकार्यक्षम झालेली असतात. मुळे कार्यक्षम करण्यासाठी मुळांभोवतीचे वातावरण मोकळे ठेवणे गरजेचे असेल. त्यासाठी खुरप्याच्या साह्याने बोदातील माती मोकळी करून घ्यावी. हे शक्य नसल्यास बोदाच्या बाजून नांगर किंवा फण मारून पाच टक्क्यापर्यंत मुळे तुटतील अशा प्रकारे कुळवून घ्यावे. किंवा बाजून छोटी चारी घ्यावी. यामुळे नवीन मुळे लगेच तयार होईल व जमिनीत उपलब्ध असलेले पालाश वेल उचलून घेऊ शकेल.

३) लवकर छाटणी झालेली बाग ः
या बागेत सध्या घड निघण्याची अवस्था, प्री ब्लूम तर काही ठिकाणी मणी सेटिंगची अवस्था असेल. घड निघण्याच्या अवस्थेत असलेल्या बागेत पाऊस किंवा पावसाळी वातावरण असल्यास गोळीघड किंवा घड जिरण्याची समस्या निर्माण होऊ शकते. या बागेत पोंगा अवस्थेच्या एक दिवसानंतर (एक ते दोन पानांची अवस्था) सायटोकायनीनयुक्त संजीवक ६ बीए १० पीपीएम या प्रमाणे एक फवारणी करून घ्यावी. त्यानंतर पालाश ०-०५० अर्धा ते पाऊण ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी. या वेळी मुळे चांगली कार्यक्षम असल्यामुळे जमिनीतून पालाशची उपलब्धता ०-०-५० एक किलो प्रति एकर या प्रमाणे दोन दिवस देता येईल.
प्री ब्लूम अवस्थेतील बागेत फेलफुटी काढण्यास प्राधान्य द्यावे. या वेळी वाढत असलेल्या फुटींद्वारे तयार होत कॅनॉपीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त वाढून या पूर्वी शिल्लक डाऊनी मिल्ड्यूचे बीजाणू कार्यान्वित होतील. पाऊस पडल्यास या घडात थोडा वेळ जरी पाणी साचल्यास कुजेची समस्या वाढू शकते. अशा ठिकाणी झिंक, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची अर्धा ग्रॅम प्रमाणे एक फवारणी आणि पालाशची एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे वेगळी फवारणी करावी.
मणी सेटिंगची अवस्था असलेल्या बागेत संजीवकांचा वापर महत्त्वाचा असेल. येथे जीए ३ (४० पीपीएम) व सीपीपीयू (१ पीपीएम) या प्रमाणे फवारणी किंवा डीप करावे. यानंतर सोर्स सिंक कार्यान्वित होण्यास सुरुवात होईल. त्याचा फायदा घेण्याकरिता घडातील मण्याची विरळणी करून घ्यावी. लवकर छाटणीच्या व काळ्या जातीच्या द्राक्ष बागेत (उदा. नानासाहेब पर्पल) मण्यांची संख्या ७० ते ७५ इतकी राखल्यास एकसारखा रंग मिळण्यास मदत होईल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com