Pomegranate Cultivation : डाळिंब लागवडीसाठी निवडा रोगविरहीत कलमे

Pomegranate Orchard : राज्यातील प्रमुख फळपीक म्हणून डाळिब ओळखले जाते. हे उष्ण व समशितोष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे फळपीक आहे. सोलापूर, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, जालना, धाराशीव, लातूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची मोठी लागवड केली जाते.
Pomegranate Cultivation
Pomegranate CultivationAgrowon

डॉ. सचिन मगर, अपुर्वा गेठे, विजय पवार

Pomegranate : राज्यातील प्रमुख फळपीक म्हणून डाळिब ओळखले जाते. हे उष्ण व समशितोष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे फळपीक आहे. सोलापूर, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, जालना, धाराशीव, लातूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची मोठी लागवड केली जाते.
मागील काही वर्षांत रोगग्रस्त कलमांची लागवड, अयोग्य बहार व्यवस्थापन, तेलकट डाग व मर रोग इत्यादी कारणांमुळे पिकांखालील क्षेत्रात घट होत आहे. उपलब्ध हवामान आणि जमिनीचा योग्य वापर करून बाजारपेठेतील मागणी आणि निर्यातीचा विचार करता राज्यात डाळींब लागवडीसाठी भरपूर वाव आहे. बागेत कीड-रोग व्यवस्थापनासह अन्नद्रव्ये आणि कीड-रोग व्यवस्थापनावरही भर देणे उत्पादनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. लागवडीसाठी निरोगी आणि जोमदार रोपे तयार करताना घ्यावयाची काळजी व लागवड व्यवस्थापनावर भर देणे गरजचे आहे.

कलम तयार निर्मिती व्यवस्थापन ः
- डाळिंबाची लागवड कलमांपासूनच करावी. गुटीकलम लावून डाळिंबाची लागवड यशस्विरित्या करता येते. गुटीकलमांमध्ये यशाचे प्रमाण जास्त असते. हे कलम उन्हाळ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही हंगामात करता येते. गुटी कलमासाठी तेलकट डाग विरहीत निरोगी मातृवृक्षाची निवड करावी.
- तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भाव ओळखण्यासाठी झाडाचे व रोपांचे परीक्षण तज्ज्ञांकडून करून घ्यावे.
- गुटी बांधण्यासाठी पेन्सिलच्या आकाराची काडी निवडावी. साधारण एक सेंमी आकाराची गोलाकार साल काढावी. त्याभोवती पाण्यात ओले केलेले शेवाळ (ग्रीन स्पगनम मॉस) पुर्णपणे घट्ट बांधून शेवाळाच्या वर पारदर्शक प्लॅस्टीक गुंडाळून सुतळीच्या सहाय्याने हवा शिरणार नाही अशा पद्धतीने बांधावे.

Pomegranate Cultivation
Gladiolus Cultivation : ग्लॅडिओलस लागवडीसाठी निवडा योग्य वाण

- गुटी बांधल्यानंतर साधारणपणे ५५ ते ६० दिवसांमध्ये मुळी फुटून पिशवीमध्ये भरण्यास तयार होते. सर्वसाधारणपणे मुळीचा रंग तांबडा झाल्यावर गुटी झाडावरून उतरावी. झाडावरील गुटी कलमे काढल्यानंतर कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी.
- रोप तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीचे सूर्यप्रकाशात किंवा पाण्याच्या वाफेने किंवा रासायनिक घटकांनी निर्जंतुककरण करून घ्यावे.
- कलम निर्मितीसाठीच्या माध्यमात जैविक घटकांचा वापर करावा. त्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा ट्रायकोडर्मा हर्जियानम १ किलो अधिक सूडोमोनास फल्युरोसन्स (१०९ सीएफयू / ग्रॅम) एक किलो अधिक निंबोळी पेंड ५ किलो, व्हॅम कल्चर २०० ग्रॅम प्रति १०० किलो माती याप्रमाणे घेऊन एकत्रितपणे किंवा वेगवेगळे मिसळावे.
- कलम निर्मितीच्या माध्यमात माती आणि चांगले कुजलेले शेणखत (५०:५० टक्के) समप्रमाणात वापरावे. या माध्यमात जैविक घटक मिसळावेत आणि त्यानंतर ८ दिवसानंतर कलमे तयार करण्यासाठी वापरावे.

Pomegranate Cultivation
Tomato Variety : टोमॅटो लागवडीसाठी निवडा हे सुधारित वाण

- कलमे तयार करण्यासाठी ४ बाय ६ आकाराची २५० गेजची काळी पॉलिथिनची पिशवी वापरावी.
- पिशवीत भरल्यानंतर कलमे चांगल्या वाढीसाठी ५० टक्केच्या शेडनेटमध्ये ठेवावीत.
- रोपवाटिकेत कलमे ठेवल्यानंतर १५ दिवसांचे अंतराने आवश्यकतेनुसार बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या फवारण्या घ्याव्यात.
- रोपांना गरजेनुसार पाणी द्यावे.
- कलमे पिशवीत भरल्यानंतर किमान ४ महिन्यांनी लागवडीसाठी वापरावीत.

लागवड पश्चात व्यवस्थापन ः
- रोपांची खरेदी खात्रीशीर शासनमान्य रोपवाटिकेमधूनच करावी. मातृवृक्ष हे तेलकट डाग किंवा मर रोगमुक्त बागेतील असल्याची खात्री करावी.
- पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजेच जून-जुलैमध्ये लागवड केल्यास रोपाची मर कमी प्रमाणात होते. लागवडीसाठी तांबड्या रंगाची मुळे असलेल्या गुटी कलमांची निवड करावी. जेणेकरून रोपांची मर टाळली जाईल.
- डाळींबाची लागवड ४.५ बाय ३.० मीटर (१५ बाय १० फूट) अंतरावर करावी. त्यापेक्षा कमी अंतरावर लागवड करणे टाळावे. कमी अंतरावर लागवड केलेल्या बागेत तेलकट डाग तसेच मर रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढते.
- रोप लागवडीनंतर साधारणपणे दोन वर्षांनी पहिला बहार धरावा. त्यापुर्वी बहार धरल्यास झाडे कमकुवत व अशक्त राहून रोगास लवकर बळी पडतात.
- सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
- झाडाजवळचे २० टक्के क्षेत्र ओलिताखाली येणे गरजेचे असते. त्यापेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली आल्यास, बागेत सूक्ष्म वातावरण तयार होऊन खोडांना लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे व मर रोग यांचा प्रादुर्भाव वाढतो.

- खोडकिडीचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी डाळिंबाला हलक्या जमिनीत चार खोडे ठेवून वळण देणे योग्य ठरते.
- दर्जेदार डाळिंब फळांचे उत्पादन घेण्यासाठी बहार व्यवस्थापन करताना पानगळ झाल्यानंतर बाहेरील फांद्याची शेंड्यापासून २० सेंमी अंतरावर छाटणी तसेच मध्यवर्ती भागात भरपूर सुर्यप्रकाश पोचण्यासाठी आतील फांद्याची विरळणी करण्याची शिफारस आहे.
- एका वर्षात एकच बहार धरावा. बहार धरल्यानंतर झाडांच्या आकारमानानुसार नियंत्रित फळे ठेवावीत. त्यामुळे फळांचा आकार वाढून दर्जेदार उत्पादन मिळते.
- गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सुक्ष्म अन्नद्रव्यांचा तसेच जिवाणू खतांचा वापर फायदेशीर ठरतो.

- नैसर्गिक पानगळ झाली नसल्यास, पानगळ करण्यासाठी बहार धरण्याच्या २० दिवस अगोदर इथ्रेल या संजीवकाची २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- खते झाडाच्या परिघात कोली करून किंवा ड्रिपरच्या खाली टाकून मातीने झाकावीत.
- ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे शक्य नसल्यास, पाटपाणी पद्धतीने उन्हाळी हंगामात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १३ ते १४ दिवसांनी (पाऊस नसल्यास) तर हिवाळ्यात १७ ते १८ दिवसांनी पाणी द्यावे.
- रोगट फळे, पाने व फांद्या गोळा करून बागेपासून दूर अंतरावर नेऊन जाळून नष्ट करावेत.
- बहार धरतेवेळी शेणखत व निंबोळी पेंड ३ किलो प्रति झाड प्रमाणे एकत्र मिसळून रिंग पद्धतीने झाडाभोवती द्यावे.
- सुत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बागेत झेंडूची लागवड करावी.
--------------------------------------------
- डॉ. सचिन मगर, ७५८८५१७९६७
(उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com