
लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद तालुक्यात माझं शेत आहे. आमचं सोयाबीनचं उत्पादन (Soybean Production) गतवर्षीच्या तुलनेत ३५ ते ४० टक्के राहील, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. सुरूवातीला जादा पाऊस (Heavy Rainfall) झाला. सोयाबीनची (Soybean Growth) पुरेशी वाढ झाली नाही.
शेंगा भरण्याच्या काळात पावसाने तीन आठवडे ताण दिला होता. त्यामुळे एकूण पिकापैकी ३० टक्के सोयाबीनमध्ये बियाणे तयार झालेले नाही. त्यानंतर पिकाला रोगाचा फटका बसला. विशेष म्हणजे सुस्थितीतल्या सोयाबीनचंही रोगामुळे नुकसान झालं.
पावसाच्या ताणातून वाचलं ते रोगाच्या तावडीत सापडलं. एकंदरीत यंदा सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघेल असं वाटत नाही.परवापासून सोयाबीनची काढणी सुरू आहे. तीन एकर रानातील सोयाबीनचा ढीग गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्केच आहे.
गतवर्षी काढणीचा दर ३१०० रूपये होता. यावर्षी ७ बॅगला ३५००० रूपये दिले. म्हणजेच बॅगच्या मागे १९०० रूपये वाढ झालीय. माझी त्याबद्दल तक्रार नाही. शेती हा असा एकमेव धंदा आहे, जिथं मजूर त्यांच्या मजुरीचे दर ठरवतात. तरीही ते खूष नाहीत.
सगळ्या महागाईचं ओझं शेतकऱ्यांनी उचलावं अशी त्यांची अपेक्षा आहे.. यावर फार बोलण्यासारखं नाही.मी मात्र या अनुभवातून नक्की धडा घेणार. या जूनपासून टप्प्या-टप्प्याने धान्य पिकविणारी शेती बंद करणार.
सोयाबीनचं क्षेत्र निम्म्यावर आणणार. म्हणजे काय ते माझं नक्की ठरलं की घोषित करतो. गुगलवर कालपासून बघतोय, शिरूर ताजबंद परिसरात अजिबात पाऊस दाखवत नाही. सकाळी ऊन पडलं म्हणून कालच्या सोयाबीन ढिगावर झाकलेलं प्लास्टिक काढलं.
दुपारी दोनच्या सुमारास गुगलवर बघितलं, दहा टक्के पाऊस दाखवत होतं. या अंदाजात पावसाचे चार थेंबही पडत नाहीत. पण ऊन कडक होतं. तापलेलं ऊन बघून वाटत होतं की,पाऊस येईल. आकाशात विखुरलेले ढग दिसत होते.
सोयाबीनच्या ढिगावर झाकायला पाहिजे, असा विचार मनात आला. तरीही अभ्यासिकेत येऊन बसलो. फक्त पाच मिनिटं झाले असतील, वामनचा फोन आला. पाऊस येईल असं वाटतंय, चवाळं झाकू या, तो बोलला.
मी अक्षरश: ढिगाकडं पळतच गेलो. वामन आला होताच. आम्ही ताडपत्री झाकायला सुरूवात केली तोच जोरदार वारा सुटला. दोन टोक आमच्या हातात आणि अख्खी ताडपत्री हवा भरल्याने उडत होती. बऱ्याच प्रयत्नानंतर ताडपत्री स्थिर करून दगड ठेवतोय तोच पाऊस सुरू झाला. आम्ही कशाबशा दोऱ्या बांधून वरच्या बाजूने आत पाणी जाणार नाही,
याची व्यवस्था केली. पूर्ण भिजलो. एवढे हाल झाले की विचारता सोय नाही. दहा मिनिटांत पाऊस थांबला. एक एकर रानावरचं सोयाबीन काढून झालेलं आहे. ते तसंच रानावर आहे. वाटलं पाऊस गेला. पण आताच जोरदार वाऱ्यासह अर्धा तास जोराचा पाऊस झालाय. हा पाऊस हातातोंडाशी आलेला अर्धामुर्धा घासही हिरावून घेणार असं दिसतंय.
मला खरोखरचं भीती वाटतेय छोट्या छोट्या शेतकऱ्यांची...ते या संकटाला कसं तोंड देतील? कसं सहन करतील हे नुकसान? मी त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो.... त्यांना हे संकट सहन करण्याची शक्ती मिळो!
निसर्गाच्या या प्रकोपात शेतीचा निभाव लागणं कठीण आहे. आज मी स्वत:ला भरपूर शिव्या देऊन घेतल्या! खरंच शेतकरी होणं ही भयंकर शिक्षा आहे. काहीही करून या बेडीतून सुटका करून घेणं गरजेचं आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.