कांदा या पिकावर फुलकिडे व करपा आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मिली अधिक टेब्यूकोनॅझोल १ मिली अधिक स्टिकर १ मिली. अँन्थ्रॅक्नोज आणि करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्षेत्रासाठी टेब्यूकोनॅझोल ६२५ मिली किंवा टेब्यूकोनॅझोल अधिक सल्फर १ लिटर (टॅंक मिक्स) किंवा हेक्साकोनॅझोल ५०० मिली या प्रमाणे फवारणी करावी. स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ३ मिली किंवा प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) २ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. सोयाबीनच्या शेंगांचा रंग पिवळट तांबूस झाल्यानंतर, जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार ९०-११० दिवसांत काढणी करून करून काडाचे छोटे-छोटे ढीग करून प्रखर सूर्य प्रकाशामध्ये शेतातच वाळवावे. त्यानंतर प्रादुर्भाव/ उगवण झालेल्या शेंगा बाजूला काढून मळणी करावी. जमिनीत पावसाचे पाणी साचून राहिले असल्यास चर खोदून पाणी बाहेर काढावे. जर ऊस पडलेला किंवा कललेला असेल तर दोन ओळीतील ऊस एकमेकांना बांधून आधार द्यावा. सरीतील पाणी ओसरताच ऊस पिकास ५० किलो युरिया व ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टर या प्रमाणे बुस्टर डोस द्यावा. ठिबक सिंचनाची सोय असेल तर विद्राव्य खतांचा वापर करावा. वाफसा येताच उसाच्या बुडख्यास मातीची भर लावावी. जमिनीत पावसाचे पाणी साचून राहिले असल्यास चर खोदून पाणी बाहेर काढावे. कपाशी पिकामध्ये पाणी साचल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मर रोगाची लक्षणे दिसू लागताच, युरिया १.५ किलो अधिक पालाश १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे १५० ते २०० मिली आळवणी प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ करावी. त्यानंतर ८-१० दिवसांनी डीएपी २ किलो प्रति १०० लिटर पाणी हे द्रावण १५० ते २०० मिली प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे. लगेच पाणी द्यावे. गुलाबी किंवा शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत. दर १५ दिवसांनी ल्युर बदलावेत. शेंगा पोखरणारी अळीच्या नियंत्रणाकरिता, पहिली फवारणी पिकास फुलकळी येताना - ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (०.०३ टक्के ३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी- पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मिली किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.७ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५० टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल ०.३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. खरिपाचे पीक निघाल्यानंतर नांगरट करून घ्यावी. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीप हंगामामध्ये सेंद्रिय खत दिलेले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर जमिनीत मिसळावे. कोरडवाहू हरभरा पेरणीसाठी शेत तयार करून घ्यावे. पेरणी १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. पेरणीसाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या बियाण्यास प्राधान्य द्यावे. पेरणी करण्यापूर्वी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रकिया करावी. यामुळे संभाव्य बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळेल. हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असल्याने कोरडे व थंड हवामान त्याला मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २५ सप्टेंबरनंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय हा वाण वापरावा. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरावा. त्याकरिता विशाल, दिग्विजय, फुले विक्रम या वाणाचे बीज उपलब्ध करून ठेवावे.