ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा दुहेरी उपयुक्ततेचे प्रमुख तृणधान्य आहे. प्रामुख्याने कोरडवाहू पीक घेतले जात असल्याने उत्पादकता कमी आहे. सोबतच विविध किडींचा प्रादुर्भाव हेही उत्पादन कमी येण्यामागील एक कारण आहे. सध्या ज्वारीवर खोडकिडीचा प्रदुर्भाव आढळत आहे.
खोडकीड ही ज्वारीवरील महत्त्वाची कीड असून, तिचा प्रादुर्भाव पूर्ण भारतभर आढळतो. पिकाच्या सर्व अवस्थेत आढळणारी ही कीड वर्षभर सक्रिय असते. मात्र, रब्बी हंगामात उष्ण हवामानात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. संकरित वाण या किडीला जास्त प्रमाणात बळी पडते. ओळख
या किडीचा पतंग हा गवती रंगाचा आहे. त्याचे समोरील पंख राखाडी पिवळसर असून, त्याच्या कडावर लहान ठिपके असतात. मागील पंख पांढरट असतात. अळी मळकट पांढऱ्या रंगाची असून, त्यावर गडद रंगाचे ठिपके असतात. डोके तपकिरी असते. पूर्ण वाढ झालेली अळी साधारणतः १२ ते १९ मिमी लांबीची असून, तिच्या अंगावर चार विस्तारित पट्ट्या असतात. नुकत्याच अंड्यातून निघालेल्या लहान अळ्या सुरवातीला पानावर उपजीविका करतात. नंतर रोपाच्या मुख्य गाभ्यात शिरून तिथेच एक ते दोन दिवस उपजीविका करते. मुख्य गाभ्यात शिरताना गाभ्याला छिद्र पडल्यामुळे, पान उघडल्यानंतर तिथे एका सरळ रेषेत बारीक गोल छिद्रे दिसतात. अळी मुख्य खोडात शिरते. तिथेच उपजीविका करत असल्याने पोंगे मर होते. झाड मरून जाते. पीक रोपावस्थेमध्ये असताना प्रादुर्भाव झाल्यास नुकसान जास्त होते. या किडीचा प्रादुर्भाव कणसे बाहेर पडण्याच्या अवस्थेपर्यंत आढळून येतो. असे झाल्यास कणसाच्या देठावर छिद्रे दिसतात. अशी कणसे वाऱ्यानेही मोडू शकतात. ही कीड मुख्यतः ज्वारीवर येत असली तरी मका, बाजरी, ऊस व अन्य काही तृणवर्गीय गवतावरही येते. मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूस मुख्य शिरेपाशी किंवा कधीतरी देठापाशी पुंजक्यामध्ये पांढऱ्या रंगाची सुमारे ३०० पर्यंत अंडी घालते. अंड्यातून सहा दिवसांनी अळी बाहेर पडते. अळी अवस्था तीन ते चार आठवड्यांची असते. कोषावस्थेत जाण्यापूर्वी अळी पतंग अवस्थेमध्ये स्वतःला बाहेर पडण्यासाठी खोडाला एक छिद्र पाडून खोडातच कोषावस्थेत जाते. कोष अवस्था ७ -१० दिवसांची असते. पतंग २-४ दिवस जिवंत राहू शकतो. अशा प्रकारे या किडीचा जीवनक्रम सहा ते सात आठवड्यांत पूर्ण होतो. एका वर्षात तिच्या चार पिढ्या होतात. अळी अवस्थेत ही कीड धसकटात किंवा कडब्याच्या खोडामध्ये सुप्तावस्थेत राहू शकते. जमिनीची खोल नांगरट व कुळवणी करून काडी, कचरा धसकटे वेचून शेत स्वच्छ ठेवावे. ज्वारीची कापणी झाल्यावर शेताची नांगरणी करून त्यातील धसकटे गोळा करून नष्ट करावीत. त्यामधील सुप्तावस्थेतील अळ्यांचा नाश होईल. रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. त्यापेक्षा अधिक पेरणी लांबल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. काही कारणाने पेरणी लांबल्यास इमिडाक्लोप्रीड (७० टक्के) ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. प्रादुर्भावग्रस्त शेतातील मळणी झाल्यावर खळ्याभोवती अथवा मळणी यंत्राभोवती पडलेले कणसाचे अवशेष गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी. त्यातील सुप्तावस्थेतील अळ्या व कोष यांचा नाश होईल. शिवाय साठवून ठेवलेले कुटार १५ मेपूर्वी जनावरांना खाऊ घालून संपवावे. खोडकिडीमुळे दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास किंवा उगवणीनंतर ३० दिवसांनी फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ इसी) ३ मिली किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मिली. (टीप- फवारणीचे द्रावण पोंग्यात जाईल याची दक्षता घ्यावी.) संपर्कः डॉ. भैयासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि. बीडअंतर्गत वनामकृवि परभणी.